मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी
marathinews24.com
जत – (रेवण कोळेकर) जत तालुक्यातील मोठेवाडी येथे असलेल्या मरगुबाई मंदिर परिसरात आज सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मंदिर परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर सुमारे २० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पुण्यातील महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा – सविस्तर बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अचानक जोरदार वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला. आज मंगळवारी मरगुबाई देवस्थान येथे यात्रा असल्यामुळे अनेक भाविक यात्रेनिमित्र आले होते. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे सर्व भाविक मंदिराच्या भिंतीलगत व पत्र्याच्या आडोशाला उभे होते. दरम्यान, वाऱ्याचा वेग वाढल्याने काही पत्रे उडून गेले आणि उभी असलेली भिंत कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक भाविक अडकल्याने घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जखमींना तत्काळ जवळील संख रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. व काहींना विजयपूर(कर्नाटक) तसेच जत येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या दुर्घटनेमुळे मोठेवाडी परिसरात शोककळा पसरली असून भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून अधिकृत मृतांचा आकडा ६ जाहीर करण्यात आलेला आहे व काहींची प्रकृती चितांजनक असल्याचे प्रशासनेने सांगितले.
























