पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पत्नीशी वाद झाल्याने एकाने घरातील साहित्य पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली. घरातील साहित्याने पेट घेतल्याने तीन पाळीव मांजरांचा मृत्यू झाला, तसेच गृहोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले. याबाबत मोहिनी दयानंद कसबे (वय ३६, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्वती गावात वडाचे झाड कोसळून दोन महिला जखमी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी आणि त्यांच्या पतीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. ९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादातून पतीने घरातील साहित्य पेटवून दिले. साहित्यने पेट घेतल्यानंतर मोहिनी घाबरून घरातून बाहेर पळाल्या. आगीत गृहोपयोगी साहित्य, तसेच मोहिनी यांनी पाळलेल्या तीन पाळीव मांजरांचा मृत्यू झाला. घराला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर रहिवाशांनी तेथे धाव घेतली. पाणी ओतून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत मोहिनी यांना दुखापत झाली नाही. घर पेटल्यानंतर आरोपी पती पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करत आहेत.
























