क्रांतिदिनी पुण्यात प्रथमच आयोजन; दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीतर्फे आयोजन; अश्वारोहण खेळातील खेळाडूंचा सहभाग
marathinews24.com
पुणे – भारत माता की जय… वंदे मातरम… च्या घोषणा, अश्वावर स्वार होऊन हाती तिरंगा ध्वज घेत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीच्या स्मृतींना अश्वारोहकांनी अभिवादन केले. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमी तर्फे क्रांतिदिनानिमित्त पुण्यात प्रथमच अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलन आयोजित करण्यात आले होते.
राज्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक – सविस्तर बातमी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन मंदिरापासून या अश्वारूढ संचलनाला प्रारंभ झाला. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी अश्वावर स्वार होत हाती तिरंगा ध्वज घेत यात्रेत सहभाग घेतला. यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे, विनायक हळबे, नरेंद्र पाटील, जनक टेकाळे, समीर धर्माधिकारी यांसह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव कवडे, शशिकांत थोरात, साइदीप ढोबळेपाटील, आशिष जाधव यांनी नियोजन व सहकार्य केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ झाला. बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे ही यात्रा मार्गस्थ झाली. तर, टिळक चौक, लकडी पूल मार्गे छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे यात्रेचा समारोप झाला. विश्रामबाग विभाग पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकास पुष्प वाहून राष्ट्रगीता नंतर समारोप झाला. आठ वर्षापासून ते साठ वर्षांपर्यंतचे अश्वारोहण करणारे १५ प्रशिक्षित घोडेस्वार या अश्व संचलनामध्ये सहभागी झाले होते.
गुणेश पुरंदरे म्हणाले, क्रांतिदिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही अनोखी अश्वारूढ तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अश्वारोहण करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांसह पुणेकर नागरिक देखील हाती तिरंगा ध्वज घेऊन चालत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. तर, अश्वावर स्वार होऊन हातात तिरंगा ध्वज घेत अनोख्या पद्धतीने क्रान्तिकारकांना देखील अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले.
दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमी मागील पंचवीस वर्षांपासून अश्वारोहण प्रशिक्षण, अश्वारोहण मोहिमा, अश्वारोहण स्पर्धा इत्यादी माध्यमातून या पारंपरिक व आधुनिक ऑलम्पिक क्रीडा प्रकार सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. नुकतीच मे महिन्यामध्ये आपण २५ किल्ल्यांवरून शिवचरित्र प्रसार ही अश्व मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्रांतिदिनी हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.






















