धावपट्टीवरून शिकाऊ विमान घसरले
marathinews24.com
बारामती – तांत्रिक बिघाडामुळे शिकाउ विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे अपघात झाल्याची घटना रविवारी (दि. ९) दुपारी बाराच्या सुमारास पुन्हा बारामतीच्या विमानतळावर घडली आहे. सुदैवाने विमान अपघातात दोन्हीही वैमानिक सुखरूप असून, त्यांना दुखापत झाली नाही. मात्र, विमान घसरल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाल्याचे चित्र होते. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच पुन्हा एकदा त्याचठिकाणी विमान घसरल्यामुळे अनेकांनी काळजी व्यक्त केली होती.
पुण्यात ऐरोस्पेस मॉलमधील बारमध्ये रात्रभर डांगडिंग – सविस्तर बातमी
बारामती विमानतळावर रविवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास प्रशिक्षण सत्रादरम्यान व्ही टी-सेक्स विमान धावपट्टीवरून घसरण्याची घटना घडली. सुदैवाने विमानातील कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे, कॅडेट अभिजित जुंद्रे यांना दुखापत झाली नाही. संबंधित वैमानिक सर्किट आणि लँडिंगशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीचा सराव करीत होते. रविवारी सकाळी ६ वाजून ३९ मिनीटांनी हे विमान सरावासाठी धावपट्टीकडे नेण्यात आले होते. त्यानंतर विमान सुरुवातीला ‘लिंक ब्राव्हो द्वारे धावपट्टीवर गेले. ‘रनवे २९’ च्या सुरुवातीच्या टोकावर थांबले होते. त्या ठिकाणाहून उड्डाण करण्याचा प्रयत्न थांबवण्यात आला. विमान धावपट्टीवर पूर्णपणे थांबवता आले नाही. त्यामुळे ‘रनवे २९’ च्या सुरुवातीच्या टोकापलीकडे पुढे घरल्यामुळे विमानाचा अपघात झाला. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विमानतळावर ८ महिन्यांत तीनवेळा अपघात
बारामती विमानतळावर मागील ८ महिन्यात साधारणपणे तीन वेळा विमान अपघाताची घटना घडली आहे. २८ जानेवारीला विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हवाई प्रवासावर प्रश्नचिन्ह करण्यात आले. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा विमानाचा अपघात झाला होता. बारामतीच्या गोजुबावी गावाच्या हद्दीत दुसरा विमान अपघात झाला होता. सुदैवाने संबंधित अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. शिकाऊ विमान हे इमर्जन्सी लँडिग करताना शेतात कोसळले होते. त्यानंतर रविवारी (दि. ९) तिसरा विमान अपघात घडला असून, तांत्रिक बिघाडामुळे विमान घसरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.






















