तोडफोड प्रकरणात आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू
marathinews24.com
पुणे – यवत गावात शांतता, पाच स्वतंत्र गुन्हे दाखल; १७ जण अटकेत – सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी यवत गावात १ ऑगस्टला तणाव निर्माण झाला. दोन गटाकडून दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी आता पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ जणांना अटक करण्यात आली आहे. तोडफोड प्रकरणात आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. गावात शनिवारी अनुचित घटना घडली नसून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
द्विदशकपूर्तीनिमित्त कनेक्टिंग ट्रस्टतर्फे- स्वयंसेवकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन – सविस्तर बातमी
पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर शुक्रवारी तणाव निर्माण झाला. शुक्रवारी सकाळी बाराच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. जमावाने वाहनांची तोडफोड केली, तसेच घरांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावास भेट दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच शांतता पाळावी, असे आवाहन केले आहे. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चाेपडे, गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावात बैठकीचे आयेजन केले होते.‘यवत गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात शांतता असून अनुचित घटना घडली नाही. ग्रामस्थांशी पोलिसांनी संवाद साधला आहे. शांतता बाळगावी, तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गावात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी (एसआरपीएफ) तैनात केली आहे.
दरम्यान दोन गटात झालेल्या तणावानंतर पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात १७ जणांना अटक करण्यात आली आहे. तोडफोड प्रकरणातील संशयित आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३० जणांची ओळख पटविण्यात आली आहे’, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले. तसेच गावात जमावंबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गावात शांतता प्रस्थापित झाली आहे. ग्रामस्थांशी बैठकाीत संवाद साधण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी केले आहे.
आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्याला ५ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर यवत गावात तणाव निर्माण झाला. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्याला पोलिसंनी शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याला अटक केली. तरुणाला शनिवारी दौंड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी तरुणाला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.




















