मूलभूत सुविधांचा अभाव व कथित भ्रष्टाचाराची पत्र लिहून मांडली व्यथा
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील परभणी केसापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अंकिता गोंविद कवचट या विद्यार्थिनीने शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव व कथित भ्रष्टाचाराबाबत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. पत्राची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अंकिताने आपल्या पत्रात शाळेची दयनीय अवस्था अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली आहे. शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतागृहांची अवस्था खराब आहे, वर्गखोल्यांची नादुरुस्त आहे. बसण्याची योग्य सोय नाही. शैक्षणिक साहित्याचाही अभाव असल्याचे तिने नमूद केले आहे.
कागदोपत्री खेळाचे साहित्य, पाणी फिल्टर, प्रोजेक्टर व इतर साहित्य दाखवले जाते; मात्र प्रत्यक्षात ते शाळेत उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही तिने पत्रात स्पष्ट केले आहे. या प्रकरणाबाबत गावच्या सरपंच प्रतीक्षा शिंदे यांना विचारणा केली असता, आमच्या गावातील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत, हे माहिती आहे, हाच आमच्या गावचा खरा विकास आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच संबंधित विद्यार्थिनीला भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एका विद्यार्थिनीने धाडसाने आवाज उठवत थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत तसेच संबंधित विद्यार्थिनीला भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थिनीने धाडसाने आवाज उठवत थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आपली व्यथा पोहोचवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, या पत्रामुळे ग्रामीण भागातील शाळांची वास्तविक परिस्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुलीने पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय ते वाचा ?
प्रति, अजित काका उर्फ दादा पवार
विषय – आमच्या शाळेसाठी मदत हवी आहे काका
आदरणीय अजित दादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड जिल्हा)
नमस्कार दादा आणि माझे काका मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या माणसाला पत्र लिहीत आहे. हात थरथरतोय पण मनातलं दुःख कोणाला तरी सांगायलाच हवा म्हणून धीर करून हे पत्र लिहीत आहे.
दादा आमची ही शाळा नावापुरती नसून आमच्यासाठी ज्ञानमंदिर आहे. येथील सर्व शिक्षक वृंद आमच्यासाठी शिकवताना आमच्या भविष्यासाठी ज्ञानार्जनाची शिदोरी आमच्या कायम पाठीशी उभे राहतील, इतके ज्ञानी, सज्जन आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक वृंद आम्हाला लाभले आहेत. पण तिथे शिकण्यासाठी कुठलीच सोय नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, नाही हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, खेळण्यासाठी साधं साहित्यही नाही, तरीही आम्ही शाळेत येतो. कारण आम्हाला शिकायचं आहे. पण दादा कागदावरच मात्र सगळं आहे असं दाखवलं जातं. आमच्या शाळेत सगळी व्यवस्था झाली आहे, असं सांगून लाखो रुपये काढले गेले आहेत, असं आम्हाला कळतंय. सरपंच बाईंचे पती हे सगळं पाहतात म्हणे, पण आम्हाला मात्र काहीच मिळालेलं नाही.
आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? आणि स्वप्न नाहीत का? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व्हायचं आहे. पण शाळेतच सोय नसेल तर आम्ही कसं पुढे जाणार? काका तुम्ही आमचे पालकमंत्री आहात, हा तुमचा जिल्हा आहे, आम्ही फार काही मागत नाही, फक्त शिकण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, खेळाचे साहित्य आणि आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी व्यवस्था द्या. दादा हे माझं पत्र वाचताना कदाचित तुम्हाला मी फार लहान वाटेल. पण आमचं दुःख मोठा आहे. एकदा तरी आमच्या शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयाने आमचा आयुष्य बदलू शकते.
आपलीच
परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी
























