दोघांना अटक, वारजे माळवाडीतील घटना
marathinews24.com
पुणे – उघड्यावर मद्यपान करीत टोळक्याने तरूणाला बेदम मारहाण करीत त्याच्यावर बाटलीने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहे. टोळक्यापैकी एकाने हवेत शस्त्र फिरवून दहशत माजविली आहे. ही घटना ९ जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास वारजेतील दर्या बारजवळ घडली. दरम्यान, तीनच दिवसांपुर्वीच शस्त्रास्त्रधारी टोळक्याने परिसरात दादागिरी करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यानंतर आता मद्यपान करणार्या टोळक्याने राडा घातला आहे. त्यामुळे वारजे माळवाडी पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसह नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी आहे की नाही, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून केली बदनामी – सविस्तर बातमी
आदित्य अशोक मारणे (वय ३०, रा. दत्तनगर वारजे) आणि विकी गेंदलाल करंजाळे (वय ३० रा. सदगुरू प्रेस्टीज, उत्तमनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार विशाल वारकड पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. धनंजय एकनाथ गुरव (वय २६ रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धनंजय गुरव हे मित्रासह वारजेतील दर्या बारसमोरील मोकळ्या जागेत लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी भिंतीपलीकडे उघड्यावर दारू पीत बसलेल्या आरोपींनी धनंजयसह त्यांच्या मित्राला तुम्ही इथे गोंधळ का करत आहेत. तुम्हाला लय मस्ती आली आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी धनंजयला शिवीगाळ करीत त्यांच्यावर बाटलीने हल्ला करीत जखमी केले. त्यानंतर आरोपी विशाल वारकड याने हातातील शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली आहे. घटनेची माहिती मिळताव वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करीत आहेत.
हवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडा
शहरात कोयताधारी टोळक्याची दहशत कायम असून, शस्त्रांचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अशीच घटना ७ जूनला रात्री साडेसातच्या सुमारास वारजे माळवाडीतील तपोधाम परिसरातील लेन क्रमांक पाचमध्ये घडली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सराईतांच्या टोळक्याने टेम्पोची काच फोडून चालकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिघानांही टोळक्याने मारहाण करीत ४५ हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी टोळक्याने शस्त्रे हवेत फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत राडा घातला.