Breking News
चेन स्नॅचिंग करणारे चोरटे २४ तासांत जेरबंदसहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कररुजवू मराठी, फुलवू मराठी” संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन उत्साहातमहिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलरुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळ

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यू

बुडालेल्या ३८ पर्यटकांना वाचविण्यात यश; १८ जखमी

marathinews24.com

पुणे : मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून रविवारी झालेल्या दुर्घटनेत तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. तर, पाण्यात बुडालेल्या ३८ पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यापैकी १८ जण जखमी आहेत. त्यात सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहून गेलेल्या पर्यटकांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मृतांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक – सविस्तर वातमी

मावळ तालुक्यातील इंदोरीत कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर जुना लोखंडी पादचारी पूल आहे. १९९३ मध्ये हा पूल बांधण्यात आला होता. कुंडमळा ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर केला जात होता.

दुचाकीही पुलावरून जात होत्या. हा पूल अतिशय जीर्ण झाला होता. लोखंडी ढाच्यावर हा सिमेंटचा पूल उभा होता. या पुलावरून एका बाजूने एकच दुचाकी येऊ शकते, एवढीच पुलाची क्षमता आहे. रविवारची सुटी असल्याने कुंडमळा येथे फिरण्यासाठी १०० पर्यटक आले होते. ६० पर्यटक या पुलावर थांबले होते. तेवढ्यात दोन्ही बाजूने दुचाकी आल्या होत्या. त्यातच दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक हा पूल कोसळला. त्यामुळे पुलावरील पर्यटक इंद्रायणी नदीतील पाण्यात पडले आणि वाहून गेले.

 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल, पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीएचा अग्निशमन विभाग, ग्रामस्थ, आपदा मित्र, शिवदुर्ग संघटनांनी बचाव कार्य सुरू केले.

सायंकाळी सात वाजेपर्यंत तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यात, तर पाण्यात बुडालेल्या ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आले. १८ जण जखमी असून त्यातील सहा पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सोमटाणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांकडून शेलारवाडीच्या दिशेने रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.

महाजन, सुळे, पवारांची घटनास्थळी भेट

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार, आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड हे घटनास्थळी उपस्थित होते.

सहा महिन्यांपूर्वी एकाचा मृत्यू

सहा महिन्यांपूर्वी या पुलावरून दुचाकी पडून एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या विनंतीनुसार रोटरी क्लबने जाळी बसवून दिली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. इंद्रायणी नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या लोकवस्तीमधील नागरिकांना रहदारीसाठी हा एकच पूल आहे.

केवळ एक दुचाकी जाईल एवढीच जागा असताना पर्यटक दोन्ही बाजूने वाहने घेऊन जातात. नदी पात्रातील पुलावर छायाचित्र काढण्यासाठी थांबतात. जीर्ण झालेल्या पुलावर अनेकजण थांबल्याने पूल कोसळला. लोक नदीत पडल्याचे दिसल्याने आम्ही काही जणांना पाण्यातून बाहेर काढल्याचे शेलारवाडी गावातील काही तरुण ग्रामस्थांनी सांगितले.

या घटनेबाबत पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले, या दुर्घटनेतील तिघांचा मृतदेह सापडला आहे. बुडालेल्या ३८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. शोधकार्य सुरू आहे. तसेच मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×