सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचे मत
marathinews24.com
पुणे – सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी समाजातील काही व्यक्ती आणि संस्था विधायक प्रयत्न करीत असतात. परंतू, समाज त्यांची पुरेशी कदर करत नाही आणि दखल घेत नाही, याचे शल्य वाटते, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले .
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ.अनिता अवचट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी देण्यात येणारा डॉ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार आज गंभीर अपघातानंतर आलेल्या पॅरालिसिसच्या आव्हानावर मात करत, स्वतःच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन कमी खर्चात पुनर्वसनासाठी उपयुक्त साधने विकसित करणारे अर्णव महर्षी यांना, तर डॉ. अनिल अवचट स्मृती सृजन सन्मान पुरस्कार दृष्टीबाधित व्यक्तींसाठी बहुभाषिक ऑडिओ पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देणारा अभिनव उपक्रम राबवणाऱ्या प्राची गुर्जर यांच्या ‘यशोवाणी’ या गटास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
निवारा सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी उपस्थित होते. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी यशोदा वाकणकर यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला.
निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले की, व्यसनाधीनता ही फार मोठी समस्या असून या समस्येमुळे समाजासमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. व्यसनी व्यक्ती व्यसनाकडे का वळते, याची कारणे शोधली असता त्यामागे अनेक आर्थिक, सामाजिक, कौंटुबिक आणि मानसिक कारणे दडलेली दिसून येतात. त्यामुळेच व्यसनाधीन व्यक्तीचा सांभाळ करणे, ही केवळ त्या कुटुंबाची जबाबदारी नसते तर ती सामाजिक जबाबदारी देखील आहे. व्यसनमुक्ती हा सामाजिक न्यायाचा भाग आहे.
या समस्येबाबत अधिक व्यापक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. व्यसनाधीनता हे सामाजिक आवाहन बनले असून यावर वैचारिक मंथन करून मार्ग काढणे आवश्यक आहे. अनेकदा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या साखळीतील कमजोर कडी कायद्याच्या कचाट्यात सापडते. मात्र, मुख्य सूत्रधार कोणी दूसराच असतो. अशा मुख्य सूत्रधारांनी अंमली पदार्थ तस्करीद्वारे एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली आहे. हे प्रकरण केवळ अंमली पदार्थांच्या तस्करी पुरते मर्यादित नसून शस्त्रास्त्रांची तस्करी आणि देशविघातक कृत्यांच्या मालिकांपर्यंत याची पाळमुळे येऊन ठेपतात.
याअध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले की, आजच्या दोन्ही पुरस्कारार्थींनी विकसीत केलेले तंजत्रज्ञान हे आस्थेवर आधारित आहे. आस्थेवर आधारित तंत्रज्ञानाचा कवेळी धीही गैरफायदा घेतला जात नाही. आजचा हा पुरस्कार सोहळा म्हणजे सामाजिक सद्भावनेचा अविष्कार आहे. चांगुलपणाची ही चळवळ आणि हे काम समाजापुढे नेण्याची गरज आहे.
यावेळी पुरस्कारार्थी अर्णव महर्षी यांनी त्यांना आलेल्या विविध अडचणींवर कशा प्रकारे मात केली, याविषयी विस्तृत विश्लेषण केले. तर यशोवाणी गटाच्या प्राची गुर्जर यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सोनाली काळे यांनी केले.
























