…अन् जयंतीदिनी सभागृहात अवतरल्या सावित्रीमाई!

...अन् जयंतीदिनी सभागृहात अवतरल्या सावित्रीमाई!

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

marathinews24.com

पुणे – अंगावर हिरव्या रंगाची साडी… डोईवर पदर… कपाळावर आडवे गंध… गळ्यात आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाचा दुपट्टा आणि सहभागी प्रत्येकजण संमेलनाध्यक्ष… अशा वेशात महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयघाेष करत असंख्य फुलेप्रेमी एस. एम. जोशी सभागृह दणाणून साेडले.

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण – सविस्तर बातमी 

निमित्त हाेते, नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात आयाेजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे! भिडेवाडाकार फुलेप्रेमी कवी, संविधानदूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. येत्या ५ जानेवारी २०२६ पर्यंत हा फुले फेस्टिव्हल रंगणार असून, महाराष्ट्रासह देशविदेशातून ८०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत.

‘सावित्रीची सावली ठरली माय फातिमा, सोबतीने वाघीण लढली माय फातिमा… बुरख्या पल्याडले तू पाहिलेस फातिमा आई, पाठीराखा बंधू उस्मानभाई…’ या कवितेने फुलेप्रेमी विजय वडवेराव यांनी उत्सवाची सुरुवात केली. ज्यांच्या घरात नाहीत फुले, त्यांच्या मनात येतील कसे फुले? असा प्रश्नही त्यांनी केला. फेस्टिव्हलमध्ये गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

विजय वडवेराव म्हणाले, “लोकसहभागातून लोकांनी केलेला लोककला जागर महोत्सव म्हणजे फुले फेस्टिव्हल आहे. महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा संयोग म्हणजे संविधान हाेय. त्यांच्या याच विचारांचा जागर व्हावा म्हणून हा उत्सव आयाेजित करण्यात आला आहे. जगभर फुले प्रेमी आणि संविधान दूत घडवणे हाच याचा उद्देश आहे. त्यामुळे विविध उपक्रमांबराेबर एक हजार संविधानाच्या प्रति वाटल्या जाणार आहेत.”

तत्पूर्वी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. ‘संविधान घ्या, संविधान द्या’ हा उपक्रम व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आला. ‘येथून विचारांची शिदोरी घेऊन जा’, असे सांगत वडवेराव यांनी ‘मी बोलत गेलो समतेची भाषा, ते विषमतेची गरळ ओकत राहिले… भुंकता भुंकता एक दिवस माझ्या मागे चालत राहिले’ ही कविता सादर केली.

दुबई येथून खास फँ फेस्टीव्हलसाठी आलेल्या जयश्री मनोज भारशंकर व कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. फुले-शाहू-आंबेडकर हा विचार जगाला दिशा देणारा आहे. या फेस्टिव्हलमधून प्रत्येकाला वैचारिक समृद्धी मिळणार असून, ज्यांच्यामुळे आपल्याला संधी मिळाली, त्यांना अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जयश्री भारशंकर म्हणाल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×