तीन दिवसांपासून रेकी, सराईत कृष्णा आंदेकरच्या नंबरकारीने प्लॅनिंग
marathinews24.com
पुणे – कुख्यात गुंड बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी टोळीने सुडास्त्र उगारले आहे. टोळीने आतापर्यंत दोघांचा खून केला असून, धनकवडीत तरूणावरील हल्ल्यासाठी १० महिन्यांपुर्वीच तयारी केली होती. तुरूंगात जाण्याआधीच सराईत कृष्णा आंदेकरने आरोपींकडे पिस्तूल दिले होते. त्यानंतर कृष्णाच्या नंबरकारी (इतर गुन्ह्यातील सहआरोपी) असलेल्या आवेज शेख याने प्लॅनिंग करीत तरूणावर गोळ्या झाडून कोयत्याने वार केले. मात्र, नशीब बलवत्तर असल्यामुळे तरूणावर वेळेत उपचार झाल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हे शाखेने ५ जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने आरोपींना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
चांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांना – सविस्तर बातमी
आवेश अशपाक शेख (वय २६ रा. गणेश पेठ) अमन फारुक बागवाले ( वय २१, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठजवळ) वेदांत श्रीनिवास टेमगिरे ( वय १९, रा. भवानी पेठ, पालखी विठोबा चौक) ऋषीप्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. तालीम, नाना पेठ) आफताब शरिफ सय्यद (वय २२, रा. कोंढवा खुर्द यांना अटक केली आहे. अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (दि.२०) सकाळी दहाच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील हॉटेलसमोर घडली आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत खून झाला होता. त्यावेळी आरोपी आकाश म्हस्के यानेच संपुर्ण कट रचल्याचा संशय टोळीला होता. तेव्हपासूनच सुडाने पेटलेल्या टोळीने बदला घेण्यासाठी थेट कुटूंबियावर हल्ला करीत खून केले. आंदेकरने स्वतःच्या नातू आयुषचा खून केल्यानंतर प्रत्येक आरोपीची रेकी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गणेश काळेवर गोळ्या झाडून खून केला. दरम्यान, वनराजच्या खूनातील आरोपी आकाशच्या कुटूंबियावर हल्ला करण्यासाठी टोळीने १० महिन्यांपुर्वीच डाव रचला होता. अटक होण्याआधी सराईत कृष्णा आंदेकर याने टोळीतील आवेश शेख याला पिस्तूल दिले होते. त्यानंतर आयुषचा खून झाल्यानंतर आवेश हा साथीदारांसह उत्तर प्रदेशात पळून गेला होता. मात्र, त्याचा गुन्ह्यात संबंध नसल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती.
हल्लेखोरांना लोणावळ्यातून अटक
हल्ल्यातील एका आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेउन चौकशी केली. त्यावेळी आरोपी हे लोणावळा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून ५ जणांना ताब्यात घेत अटक केली. आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला, गुन्ह्यात वापरेली दुचाकी कोणाची आहे, गुन्ह्यात आणखी कोणाचा आहे, याप्रकरणाचा तपास केला जात आहे. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव, वरिष्ठ निरीक्षक अश्विनी जगताप, उपनिरीक्षक राहूल मखरे, विनोद शिंदे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयूर भोसले, सुहास डोंगरे, नीलेश साबळे, युवराज कांबळे, उमेश मठपती, अविनाश दळवी यांनी केली.
आरोपींचे कुटूंबिय रडारवर, टोळीयुद्ध वाढणार
कोमकर-आंदेकर टोळीयुद्ध पेटले असून, आता दोन्ही टोळ्यांकडून एकमेकांचे कुटूंबिय लक्ष्य केले जात आहे. यामध्ये अवघ्या काही दिवसांत रेकी करून थेट गोळीबार करीत कोयत्याने वार केले जात आहे.दरम्यान, यापुर्वी टोळ्यांच्या वादात कधीही कुटूंबियांवर हल्ले केले जात नव्हते. मात्र, हल्लेखोरांना धडा शिकवण्यासाठी एकमेकांचे कुटूंबिय रडारवर आल्यामुळे टोळीयुद्ध वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.























