छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आजच्या प्रशासनासाठी दीपस्तंभ– राहुल गिरी

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आजच्या प्रशासनासाठी दीपस्तंभ– राहुल गिरी

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते आयोजन

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – शिवरायांचे प्रशासन हे केवळ युद्ध कौशल्यावर आधारित नसून, ते मूल्याधिष्ठित लोक कल्याणकारी व दीर्घदृष्टीचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आजच्या प्रशासनासाठी दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन व्याख्याते राहुल गिरी यांनी केले आहे. त्यांनी विविध ऐतिहासिक दाखल्यांच्या माध्यमातून महाराजांचे कार्य स्पष्ट केले.

मॉरिशसमध्ये होणार मराठी अस्मितेचा जागतिक जयघोष – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ व १९ फेब्रुवारीला दोन दिवसीय शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा, कार्याचा व राज्यकारभारातील मूल्यांचा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत प्रसार करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारीला राज्याचे लोकप्रिय वक्ते, अभ्यासक तसेच बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र राहुल गिरी यांच्या प्रभावी व अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, विविध विभागांचे तहसीलदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गिरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारातील सर्वसमावेशकता, लोकाभिमुख प्रशासन, न्यायनिष्ठा, धार्मिक सहिष्णुता, महिलांविषयी असलेला सन्मान, शेतकरी व सामान्य जनतेबद्दलची संवेदनशीलता यांचा सखोल व संदर्भपूर्ण ऊहापोह केला.
शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ भौगोलिक विस्ताराचे स्वप्न नव्हते, तर ते सामान्य माणसाच्या सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी व न्यायासाठी उभे राहिलेले लोकशाही मूल्यांचे बीज होते, असे प्रतिपादन केले. त्यांच्या ओघवत्या भाषा शैलीमुळे व अभ्यासपूर्ण मांडणीमुळे उपस्थित अधिकारी, कर्मचारी व श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. व्याख्यानादरम्यान अनेक वेळा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवरायांच्या जीवनातील अनेक अनोखे, दुर्लक्षित व प्रेरणादायी पैलू ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेलेले दिसून आले. व्याख्यानानंतर सभागृहात वेगळाच उत्साह, आत्मविश्वास व प्रेरणा संचारल्याचे जाणवत होते.
याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाचा उपस्थितांवर अत्यंत सकारात्मक व परिणाम झाला आहे. शिवरायांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने उपक्रम यशस्वी ठरला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×