नियोजन व उपाययोजनेवर झाली चर्चा
marathinews24.com
पिंपरी – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत वारीच्या काळात होणाऱ्या गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मनुष्यबळाचा वापर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्वस्त धान्य दुकानदारांचे पाच महिन्यापासून कमिशन रखडले – सविस्तर बातमी
यावेळी अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, बापु बांगर, सहायक आयुक्त राजेंद्रसिंग गौर, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भिमराव नरके, सतिश नांदुरकर उपस्थित होते. तसेच श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदी विश्वस्त समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु, ह.भ.प. शांतीनाथ महाराज, पालखी प्रस्थान सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, विश्वस्त अॅड. श्री. राजेंद्र उमाप, ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे, ह.भ.प. श्रीमहंत पुरुषोत्तम महाराज, मुरलीधर पाटील आणि अॅड. डॉ. रोहीणी पवार हेही उपस्थित होते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वारीच्या काळात संभाव्य अडचणी, विशेषतः वाहतूक कोंडी, गर्दी नियंत्रण, सुरक्षा उपाययोजना यांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांनी यंत्रणांमध्ये समन्वय साधत काटेकोर नियोजन करून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन, पोलीस विभाग आणि देवस्थान समिती यांच्यात समन्वय राखत नियोजनबद्ध व सुरक्षित वारी घडवून आणण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरली. उपस्थित मान्यवरांनी भाविकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.