३ मुलींना नव्याने शिक्षणाचा मार्ग सापडला
marathinews24.com
पुणे – समाजात अजूनही काही मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. पण कोंढव्यातील मुलीच्या हृदयस्पर्शी आर्त हाकेला दामिनी मार्शलनी प्रतिसाद दिल्याने एका लहानगीच आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे वळले आहे. ३ लहान मुलींना पुन्हा शाळेचे दार खुले होऊन मुलींचे आयुष्य उजळले आहे.कोंढवा पोलिस ठाण्यातील दामिनी आयोध्या चेचर यांच्या पुढाकारामुळे मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
श्रीलंकेमध्ये गणेशोत्सवात होणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना – सविस्तर बातमी
शाळेत शिकणारी हुशार विद्यार्थिनी अचानक अनुपस्थित राहू लागल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोंढवा पोलिस ठाण्यातील दामिनी आयोध्या चेचर यांच्याशी संपर्क साधला. चौकशी केली असता मुलीच्या शिक्षकांनी सांगितले की, मुलगी घाबरलेली आहे. काहीतरी अडचण तिला सतावत आहे. त्यानंतर दामिनी मार्शल शाळेच्या मुख्याध्यापकांसह थेट मुलीच्या घरी पोहोचल्या. घराला कुलूप असतानाही त्यांनी आवाज दिल्यावर मुलगी आणि तिची लहान बहिण सापडल्या. संवाद साधताच मुलीने डोळ्यात अश्रू होते तर दुसरीकडे ती खरी परिस्थिती सांगत होती.
आम्ही तीन बहीणी असून, आई दररोज भीक मागायला नेत होती. खेळण्याचे, शिकण्याचे वय असताना त्या मुलींना रस्त्यावर उभे रहावे लागत होते. मलाही इतर मुलांसारखे शाळेत जायचे आहे, शिकायचे आहे, हे वाक्य ऐकून दामिनी मार्शल अधिक निर्धाराने उभ्या राहिल्या. दोन-तीन दिवस मुलींच्या आईवर लक्ष ठेउन पुरावे गोळा करीत महिलेला पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी तिला कठोर समज देऊन मुलांना शाळेत पाठवण्यास सांगितले. पुढे शाळा व पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मुली पुन्हा शाळेत दाखल झाल्या. समाज आणि पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच तीन निरागस जिवांचे भविष्य अंधारातून प्रकाशाकडे वळले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक वर्षा देशमुख आणि दामिनी मार्शल आयोध्या चेचर यांच्या प्रयत्नातून पुन्हा मुलींच्या आयुष्याला दिशा मिळाली.
मुली आनंदाने शिक्षण घेत असून, आमच्या प्रयत्नांना यश आलं, हेच खरं समाधान आहे. संवेदनशीलतेने पावले उचलली तर मुलींच्या आयुष्यातील अंधार दूर होऊ शकतो.बेटी बचाव, बेटी पढाव ही योजना फक्त घोषणांपुरती न राहता प्रत्यक्षात उतरताना या घटनेतून दिसून आली. – आयोध्या चेचर, दामिनी मार्शल, कोंढवा पोलिस ठाणे.






















