डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दाखविलेल्या तातडीच्या आणि संवेदनशील प्रतिसादाचे जनतेकडून कौतुक
marathinews24.com
शिरूर – तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दाखविलेल्या तातडीच्या आणि संवेदनशील प्रतिसादाचे जनतेकडून कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी शिरूर-आंबेगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने डॉ. गोऱ्हे यांना पत्र पाठवून त्यांच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
हास्ययोग म्हणजे तणावमुक्त, आनंदी जीवनाचे प्रभावी औषध – सविस्तर बातमी
बांगर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, डॉ. गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार मृत बालिका शिवन्या शैलेश बोंबे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासन व वनविभागाच्या वतीने तत्काळ १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अशा कठीण प्रसंगी कुटुंबाला आधार देण्याचे कार्य त्यांनी संवेदनशीलतेने पार पाडले, हे अत्यंत समाधानकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड हे तालुके ‘Leopard Conflict Management Zone’ म्हणून घोषित करण्याची आणि “Wildlife Conflict Command Center”, GIS आधारित मॅपिंग तसेच विमा योजनेच्या संकल्पना राबविण्याची डॉ. गोऱ्हे यांनी केलेली दूरदृष्टीपूर्ण मागणीही बांगर यांनी अत्यंत स्वागतार्ह ठरविली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, “डॉ. गोऱ्हे यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे या भागातील जनतेमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना दृढ झाली आहे. त्यांनी दाखविलेली तत्परता आणि सकारात्मक दृष्टिकोन हा लोकप्रतिनिधींसाठी आदर्श आहे.” शिरूर–आंबेगाव परिसरातील जनतेच्या वतीने सचिन बांगर यांनी डॉ. गोऱ्हे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, बिबट समस्या सोडविण्याच्या त्यांच्या पुढाकाराला पाठिंबा देण्याची भूमिका व्यक्त केली आहे.






















