पश्चिम घाट संवर्धनासाठी आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञांच्या स्मृतींना पुण्यात भावपूर्ण अभिवादन
marathinews24.com
पुणे – “पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या निधनाने देशातील पर्यावरण चळवळीची अपरिमित हानी झाली असून, त्यांचे विचार आणि कार्य प्रत्येक पर्यावरणप्रेमीला कायम प्रेरणा देत राहील,” अशी भावना व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त – सविस्तर बातमी
वनराई संस्थेच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी खासदार वंदना चव्हाण, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर, उल्का महाजन, डॉ. संजय खरात, प्रदीप पुरंदरे, डॉ. अजित वर्तक, सचिन पुणेकर, सुमंत पांडे, अमित वाडेकर यांच्यासह पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. गाडगीळ यांच्या पर्यावरण संरक्षणातील योगदानाचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
“डॉ. माधव गाडगीळ यांच्या व्यक्तिमत्त्वात विद्वत्ता आणि विनयशीलतेचा सुरेख संगम होता. ते शेवटच्या क्षणापर्यंत समाजासाठी आणि निसर्गासाठी कार्यरत राहिले,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पर्यावरण संवर्धनाच्या विचारांना व्यापक दिशा मिळाली, असेही यावेळी मान्यवरांनी सांगितले.
श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून डॉ. गाडगीळ यांच्या पर्यावरणस्नेही विचारांचा आणि लोकसहभागावर आधारित विकासाच्या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.























