विषारी दारूकांडानंतर जिल्हाधिकाऱ्याचे आदेश
marathinews24.com
पुणे – शहरातील विषारी दारूकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू व्यवसायाविरोधात मोहीम तीव्र केली असून गावपातळीवरील यंत्रणांना थेट जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या हद्दीत हातभट्टी दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक किंवा विक्री सुरू असल्याची माहिती दडविल्यास संबंधित सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी उत्पादन शुल्क विभागाला नोटीस पाठविण्याबाबत आदेश दिले आहेत.
तब्बल ११९ गुन्हे असलेल्या कुख्यातासह टोळीला बेड्या – सविस्तर बातमी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढलेल्या नोटिशीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदींचा उल्लेख केला आहे. कायद्यानुसार अवैधरीत्या दारू तयार करणे, भट्ट्या चालविणे, साठा करणे किंवा विक्री करणे हा दंडनीय गुन्हा असून त्यासाठी दंड आणि कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे गावातील अशा बेकायदा कारवायांबाबत स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावात सुरू असलेल्या हातभट्टी दारू व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, कच्चा माल पुरवठादार, वाहतूकदार किंवा दारू विक्रेत्यांची माहिती मिळाल्यास ती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणे बंधनकारक राहणार आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी माहिती मागितल्यास संबंधित जागेच्या मालकी हक्काची आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीची केंद्रे गायरान, सरकारी माळराने, नदी-नाले परिसर, सामाजिक वनीकरण क्षेत्र तसेच वनविभागाच्या जमिनींवर सुरू आहेत. त्यामुळे अशा जागांवरील अतिक्रमणे हटवून त्यांचा कायदेशीर वापर सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विषारी दारूकांडानंतर प्रशासनावर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. केवळ धाडी टाकून नव्हे, तर गावपातळीवरील माहिती यंत्रणा सक्रिय करून हातभट्टी व्यवसायाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.





















