ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ कायदा राज्यात लागू होण्यापूर्वी पुण्यात पहिले दोन गुन्हे नुकतेच दाखल झाले. खडक पोलीस ठाण्यात ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध धर्मपरिवर्तनासाठी आकर्षित केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात धर्मगुरुंना पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ‘धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू होण्यापूर्वीच ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची घाई केली. ही कारवाई चुकीची असून, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे’, असे त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
दुबईहून आलेला तरुण पुणे विमानतळावरुन बेपत्ता – सविस्तर बातमी
गुरुवार पेठेतील एका प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान ब्रिटनहून आलेल्या धर्मगुरूंचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. ‘या कार्यक्रमात हिंदू देवदेवतांविषयी भ्रम निर्माण करण्यात आला. अंधश्रद्धा पसरवली. तसेच, नागरिकांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी आकर्षित केले,’ असा आरोप करुन धर्मगुरुविरोधात एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर धर्मगुरूविरुद्ध स्थलांतर आणि परदेशी नागरिक कायदा २०२५, तसेच महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. धर्मगुरु मूळचे ब्रिटनमधील मँचेस्टरचे रहिवासी आहेत. फुरसुंगी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर धर्मांतर कण्यासाठी दबाव आणल्याचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. धर्मगुरुविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांच्या न्यायालयात शिवाजीनगर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
धर्मगुरुंना या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनयम २०२६ या कायद्याची अधिसूचना १७ ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आली. या कायद्याची २८ ऑगस्टपासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी खडक पोलीस ठाण्यात ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध धर्मांतरणाच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. कायदा लागू होण्यापूर्वी पोलिसांनी नवीन कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्याची घाई केली’, असे ॲड. ठोंबरे यांनी नमूद केले. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा ‘त्यांनी प्रकरणाची माहिती घेतो’, असे सांगितले.
पुणे पोलिसांच्या घाईमुळे धर्मगुरुविरुद्ध कायदा लागू होण्यापूर्वीच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. या कारवाईमुळे धर्मगुरुंची नाहक बदनामी झाली. लंडनमध्ये ही बातमी वाचण्यात आली. याचे परिणाम भारत आणि ब्रिटनमधील संबंधावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. त्या कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. काही संस्था, संघटनांना खूश करण्यासाठी पोलिसांनी कायदा लागू होण्यापूर्वी ही कारवाई केली. ही कारवाई निंदनीय आहे.
– ॲड. विजयसिंह ठोंबरे






















