कृतज्ञता समारंभाने भारावल्या वीरपत्नी; ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये राष्ट्रभक्तीचा जल्लोष
marathinews24.com
पुणे – भारताच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षाचे औचित्य साधून सूर्यदत्त शिक्षण संस्थेतर्फे १४ ते २२ ऑगस्ट या कालावधीत आयोजित विशेष स्वातंत्र्यदिन उपक्रम सप्ताहाचा सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये दिमाखदार, देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या निमित्ताने ११ वीरपत्नींना ‘वीर नारी सन्मान’, प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक व त्यांच्या टीमचा ८० देशभक्तीपर गीतांचा विशेष कार्यक्रम यामुळे सूर्यदत्त कॅम्पस अक्षरशः देशभक्ती, अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने भारून गेला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दमदार आणि प्रेरणादायी भाषणाने कार्यक्रमाला विशेष ऊर्जा मिळाली. संस्थेच्या उपाध्यक्षा व सचिव सौ. सुषमा चोरडिया यांचेही या उपक्रमाला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सहभाग घ्यावा-चेतन कलशेट्टी – सविस्तर बातमी
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ११ वीरपत्नींचा ‘वीर नारी सन्मान’ करण्यात आला. त्यांच्या त्याग, धैर्य, संयम आणि देशनिष्ठेला अभिवादन करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, तिरंगा महावस्त्र, सन्मानपत्र आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेला फेटा प्रदान करून वीरपत्नींना गौरविण्यात आले. देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबीयांप्रती समाजाची कृतज्ञता व्यक्त करणारा हा सन्मान सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवातील अत्यंत हृदयस्पर्शी क्षण ठरला.
स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षाच्या औचित्याने प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक आणि त्यांच्या टीमने तब्बल ८० देशभक्तीपर गीतांचा विशेष कार्यक्रम सादर केला. विविध भारतीय भाषांतील गीतांमधून भारताच्या विविधतेचे, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे, शौर्याचे, राष्ट्रीय एकात्मतेचे आणि देशाच्या अभिमानाचे प्रभावी दर्शन घडले. गीतांच्या प्रत्येक सादरीकरणाला विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक क्षणी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले, तर अनेक जण भावुक झाले. ८० गीतांमधून भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यवर्षाला दिलेली ही अनोखी संगीतपूर्ण मानवंदना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्ततर्फे जितेंद्र भुरुक व त्यांच्या टीमला ‘सूर्यभारत एक्सलन्स अवॉर्ड-इन द फिल्ड ऑफ म्युझिक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षात देशाला केवळ स्वातंत्र्याची आठवण करून देणे पुरेसे नाही, तर त्या स्वातंत्र्याचे मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शिक्षण, संस्कार, कौशल्य आणि राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून सक्षम युवा पिढी घडविणे हीच विकसित भारताच्या निर्मितीची खरी दिशा आहे. आजच्या संस्कारी, सक्षम आणि राष्ट्रनिष्ठ युवा पिढीच्या हातूनच उद्याचा आत्मनिर्भर, विकसित आणि गौरवशाली भारत घडणार आहे. आपल्या वीरजवानांनी देशासाठी आपल्या प्राणांचे दिलेले बलिदान, त्यांचा त्याग व समर्पण याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे.”
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या प्राजक्ता पाटकर यांनी केले. विविध विभागांच्या एचओडींनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन डॉ. सुनील धनगर यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आणि ऊर्जा प्राप्त झाली.
वीरपत्नी कांचन सरोदे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘सूर्यदत्त’ने आयोजिलेला आजचा कार्यक्रम खूप छान होता. आजवर कोणत्याच संस्थेने अशाप्रकारे कार्यक्रम घेतला नाही. आपण दिलेल्या सन्मानामुळे आम्ही सर्व वीरपत्नी भारावून गेलो आहोत. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्सने आम्हा वीरनारीना बोलावून जो सन्मान दिला, त्याबद्दल सूर्यदत्त ग्रुप इन्स्टिट्यूट्सचे प्रमुख प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया यांच्यासह सर्व स्टाफचे खूप खूप आभार व्यक्त करते.





















