शेतमजुरांमुळे मोठा अनर्थ टळला
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडीतील ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि . २१) घडली आहे. घटनेमुळे संपूर्ण शिरूर कासार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनकर्णिका शिवराम नेटके असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले महिलेचे नाव आहे , ही घटना रुपुर शिवारातील गट क्रमांक २५ मध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
डेटिंग ॲपद्वारे बोलवून घेत तरुणाला लुटले – सविस्तर बातमी
शेतातील कामात व्यस्त असलेल्या मनकर्णिका यांच्यावर बिबट्याने झडप घातली. मात्र त्यांनी आरडा ओरडा केल्यामुळे शेजारील शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तातडीने धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. शेतमजुरांमुळे महिलेचा जीव वाचला असून अनर्थ टळला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या मनकर्णिका यांना तातडीने शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
फुलसावंगी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाने यापूर्वीच सांगितले होते. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. दिरंगाईचा फटका महिलेला बसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. कोळवाडीच्या सरपंच पूजा नेटके यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर वनरक्षक नवनाथ काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा पूर्ण केला आहे. वनविभागाने आता या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांनी शेतात काम करताना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
























