पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक बदल
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातून २७ ते २९ ऑगस्ट दरम्याण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर ते आळेफाटामार्गे ओतूर ते बनकर फाटामार्गे किल्ले शिवनेरी येथे येणार असून दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरीवरुन नारायणगाव मार्गे मंचर- खेड-चाकण-तळेगाव ते लोणावळामार्गे मुंबईकडे जाणार आहे. समाज बांधवांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी व कायदा व सुव्यसस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी २७ ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार वाहतुकीमध्ये बदल केला आहे.
वाहतूक पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. नगर कल्याण मार्गावरील वाहतूक १४ नंबर जांबु फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर -बेल्हे- अळकुटी, पारनेर, अहिल्यानगर मार्गे जातील. नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा -शिरोली बुद्रुक मार्गे वळविण्यात आली आहे. पुणे-नाशिक महामार्ग क्र.५० व बायपास महामार्ग यावरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहतूक नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा-मंजर पोलिस स्टेशन- नागापूर-रोडेवाडीफाटा ते लोणी-पाबळ मार्गे शिक्रापूर-नगर रोडमार्गे पुणे अशी वळविण्यात आली आहे. नारायणगावकडून येताना बायपास क्र.६० मार्गे मंचर ते निघोटवाडी सरळमार्गे मोर्चा जाताना जीवन खिंड-मंचर शहर-अवसरी फाटा ते जीवन खिंड-नंदी चौक अशी वळविण्यात आली आहे.
खेडकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाबळमार्गे जातील.
जुना पुणे-मुंबई महामार्ग क्र.४८ वरील वाहतूक नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली असून चाकण-देहु रोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरुन द्रुतगती मार्गावरुन उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे वळविण्यात येईल.
मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने वलवण एक्झीटवरुन लोणावळा शहरात न वळविता मुंबईकडे जातील. जुना मुंबई ते पुणे मार्गावरुन पुण्याकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा-वलवण एक्झीटवरुन लोणावळा शहरात अथवा जुन्या महामार्गावर न वळविता पुण्याकडे जातील.
लोणावळा शहर परिसरातून पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावरुन न जाता वलवण पुलावरुन द्रुतगती मार्गाने मुंबई व पुण्याकडे जातील. आदेशाची अंमलबजावणी २७ ऑगस्टच्या रात्री १० वाजल्यापासून २९ ऑगस्टच्या रात्री १२ पर्यंत लागू राहील.





















