महिला आयोगाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – मुला- मुलींच्या फोटोंचे वेगवेगळे प्रोफाईल तयार करून त्यातील नाव, जात बदलून त्या प्रोफाईल वधू-वर शोधणाऱ्या कुटुंबियांना पाठविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाह मंडळाच्या संगणमतातून हा प्रकार घडत असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. विवाहासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक सोहळ्यासाठी वधू-वर शोधणाऱ्या पुणेकरांना टार्गेट करणाऱ्या विवाह मंडळांच्या तिघांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाकडे झालेल्या तक्रारीनंतर आयोगाने अहवाल सादर करण्यात आल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
ज्येष्ठ महिलेची एक कोटी १९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
प्रतिभा योगेश तरसे (स्वामीकृपा धर्ती, धन रो हाऊस, रोहिणीनगर, पंचवटी, नाशिक), विद्या देशपांडे आणि निलेश केशव वऱ्हाडे (रा. श्री दत्त रोह हाऊस नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. राजेश रामचंद्र बेल्हेकर (वय ६१, रा. महर्षीनगर, पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार राजेश बेल्हेकर हे त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुलगी शोधत होते. ९ मार्च २०२५ रोजी त्यांनी एका वृत्तपत्रात ‘वर पाहिजे’ सदरातील ‘शुभऋषी विवाह मंडळा’ची जाहिरात दिसली. त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. सुरुवातीला मंडळाकडून सासवड (जि. पुणे) येथील मराठा वधूची माहिती फोटोसह पाठवण्यात आली. बेल्हेकर यांनी मुलाचा फोटो आणि माहिती पाठवल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मुलीकडील पसंत असल्याचा संदेश आला. मंडळाची वेबसाईट व संपर्क साधण्यासाठी ३ हजार ५०० रुपये वार्षिक वर्गणी ‘गुगल पे’ किंवा ‘फोन पे’द्वारे भरण्यास सांगण्यात आले.
बेल्हेकर यांनी काही दिवस विचार करून हा विषय बाजूला ठेवला. मात्र, २ एप्रिल २०२५ रोजी त्यांना त्याच मंडळाची दुसरी जाहिरात दिसली. त्यांनी दुसऱ्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. हा नंबर विद्या देशपांडे यांचा असल्याचे समजले. विद्या देशपांडे यांनी सुरुवातीला दौंड येथील वधूची माहिती पाठवून बेल्हेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ३ एप्रिलला त्यांनी कात्रज (पुणे) येथील दोन वधूंची माहिती पाठवली. वार्षिक वर्गणीची रक्कम ३ हजार ५०० ऐवजी ३ हजार रुपये भरण्यास सांगितली. पैसे भरल्यानंतर विद्या देशपांडे यांनी सर्व पाचही वधूंचे पत्ते आणि संपर्क क्रमांक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तगादा लावल्यानंतर त्यांनी दौंड आणि कात्रज येथील दोन वधूंच्या आईचे पत्ते आणि फोन नंबर दिले. धायरी येथील एका वधूचा पत्ता व फोन नंबर तर खोटा असल्याचे नंतर उघड झाले. तर उर्वरित दोन वधूंचे पत्ते देण्यास त्यांनी आज अखेर टाळाटाळ केली. मंडळाकडून आलेल्या मेसेजमध्ये एका वधूकडून नकार आल्याचे खोटे कळवण्यात आले. तर पूर्वी त्याच वधूकडून पसंती दर्शवण्यात आली होती.
विवाह मंडळाचे संगणमत असून, दोन विवाह मंडळाशी संपर्क साधल्यानंतर मला ज्या मुलींची प्रोफाईल पाठविण्यात आली. त्यांचे फोटो आणि तेच पण नावे वेगवेगळी असल्याच्या प्रकाराने धक्काच बसला. त्यामुळे याप्रकरणात खोलाशी जाण्याचे ठरविल्यानंतर विवाह मंडळांकडून फसवणूक झाल्याचे समजले. काही वधुवर सुचक मंडळांकडून कमालीची आर्थिक फसवणूक, बनावट फोटो, बनावट प्रोफाईल्स तयार करणारे रॅकेट आहे. या सर्व विवाह मंडळांना कायदा व नियमांच्या कक्षेत आणले पाहिजे. राज्य महिला आयोगाने माझ्या तक्रारीचे गांभीर्य ओळखल्याने मी त्यांचे आभार मानतो. – राजेश बेल्हेकर, पिडीत नागरीक























