५ हजार पोलीस तैनात, अधिकारी-कर्मचारीही वारीत सहभागी होणार
marathinews24.com
पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी तगडी सुरक्षा तैनात केली आहे. कर्मचारी- अधिकारी असा तब्बल ५ हजारांवर मनुष्यबळाचा बंदोबस्त तैनात केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातून मानाच्या ६ पालख्या मार्गक्रमण करणार असून, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या सोहळ्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीन या अन् पदार्थाचा साठा जप्त – सविस्तर बातमी
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल म्हणाले, पालखी सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एसआरपीएफचे जवान, क्यूआरटी , निर्भया पथक , स्थानिक गुन्हे शाखेसह महिलांची विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. प्रामुख्याने वारकर्यांच्या मदतीसाठी फिरते पोलीस मदत केंद्र उभारण्यात येणार असून, पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणीही कडक बंदोबस्त ठेवून गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. याशिवाय, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून संपूर्ण हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन केले आहे.
स्वागत मंचांवर डीजेला पूर्णपणे बंदी
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी डीजे वादन केले जाते. त्यापार्श्वभूमीवर यंदा स्वागत मंचांवर डीजेला पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, यंदाची वारी डीजे आणि लाऊड स्पीकरमुक्त असणार आहे. पर्यावरणपूरक उपक्रमाला चालना देण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून यंदा ‘हरित वारी’ उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे संदीपसिंह गिल यांनी सांगितले.
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी आतापासून नियोजन केले आहे. वारकर्यांची सुरक्षितता, वाहतूक नियोजन, पालखी मुक्काम, प्रस्थानासह ठिकठिकाणी संबंधित पोलिसांसह प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. वारकर्यांची सेवा करण्यासाठी पोलीस दल आतुर झाले आहे.
संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण





















