मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – पालखी सोहळ्यात हरवलेल्या जेष्ठ महिलेची संबंधित दिंडी प्रमुखासोबत भेट घडवून देत मार्केटयार्ड पोलिसांनी जबाबदारीचे दर्शन घडवले आहे. दरवर्षी लाखो वारकरी पायी पंढरपूरला जाण्यासाठी पुण्यातून मार्गस्थ होतात. शुक्रवारी (दि. २०) पुण्यात संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन झाले. यावेळी शेकडो दिंड्या शहरात मुक्कामी आल्या आहेत. त्यापैकी दिंडीतील एक महिला वारकरी तिच्या दिंडीपासून चुकली होती. संबंधित वारकरी महिलेला मार्केटयार्ड पोलिसांनी सुखरूप दिंडी प्रमुखांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने शहरात सर्वत्रच चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील पथकासह पेट्रोलिंग करत होत्या. त्यावेळी एक महिला घाबरलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली. त्यांची पोलिसांनी विचारपूस केली असता, त्या महिलेने दिंडीमध्ये आल्याचे सांगत, चुकल्याचे सांगितले. सीमा दत्तात्रय ठाकूर ( वय ५५, रा. दसखार, भटआळी) असे नाव महिलेने पोलिसांना सांगितला. मात्र, त्यांच्याकडे कुणाचाही मोबाईल नंबर नसल्याने सविस्तर माहिती देणे महिलेला शक्य नव्हते.
त्यामुळे मार्केटयार्ड पोलिसांनी उरण पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. उरण पोलिसांनी संबंधित महिलेच्या पतीचा व दिंडी प्रमुखाचा नंबर मिळवून तो मार्केटयार्ड पोलिसांना दिला. पोलिसांनी लगेच दिंडी प्रमुखाला फोन करत संबंधित महिलेबाबत माहिती देत, त्यांना पोलिस ठाण्यात बोलवले. त्यांच्याकडे खात्री करून सीमा ठाकूर यांची दिंडी प्रमुखांची भेट घडवून आणली.