प्रस्ताव अंतिम टप्प्यात
marathinews24.com
पुणे – शहरातील वाढली लोकसंख्या, त्याबरोबरच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता पोलिस ठाण्यांबरोबरच पोलिस चौक्यांचे महत्त्वही अधिक अधोरेखित झाले आहे. विशेषतः मेट्रो शहरात नागरिकांना तातडीने पोलिस मदत उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस चौक्या महत्त्वाची भूमिका बजावतात. याच अनुषंगाने शहरात लवकरच नव्याने काही पोलिस चौक्यांची स्थापना केली जाणार आहे. साधारण प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ३ पोलिस चौक्यांचे नियोजन केले जाणार आहे.
शहरातील अनेक पोलिस चौक्या काही कारणांमुळे यापूर्वी बंद अवस्थेत होत्या. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकाराने शहरातील सर्व पोलिस चौक्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना स्थानिक पातळीवर पोलिस सेवा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
रोहित्राची तोडफोड करुन पावणेदोन लाखांची तांब्याची तार चोरीला – सविस्तर बातमी
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने गेल्या वर्षी शहरात पाच नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार मांजरी, लक्ष्मीनगर, नऱ्हे, लोहगाव आणि येवलेवाडी ही पाच नवीन पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात आली आहेत. या नव्या पोलिस ठाण्यांमुळे पुणे पोलिस दलाला वाढीव मनुष्यबळही उपलब्ध झाले आहे.
नव्याने सुरू झालेल्या पोलिस ठाण्यांपैकी दोन पोलिस ठाणी सध्या पोलिस चौकीच्या जागेतूनच कार्यरत आहेत. शहरात सायबर पोलिस ठाण्यासह सध्या एकूण ४५ पोलिस ठाणी कार्यरत आहेत. मात्र, या तुलनेत पोलिस चौक्यांची संख्या अपुरी असल्याचे चित्र आहे. सध्या शहरात केवळ ११० पोलिस चौक्या असून, किमान १३५ पोलिस चौक्यांची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन पोलिस चौक्या असाव्यात, या उद्देशाने नवीन पोलिस चौक्यांचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांना मोठा फायदा
शहरात गरजेनुसार नवीन पोलिस चौक्या सुरू झाल्यास त्याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी लांब अंतर पार करावे लागणार नाही, घटनास्थळी पोलिस अधिक वेगाने पोहोचू शकतील, स्थानिक पातळीवर गस्त वाढेल आणि गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. परिणामी, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, शहरात नव्याने काही पोलिस चौक्या स्थापन करणे गरजेचे आहे. काही पोलिस ठाण्यांची हद्द मोठी असल्याने तिथे किमान ३ पोलिस चौक्या असणे गरजेचे आहे. लवकरच याबाबत गृह विभागाला आम्ही प्रस्ताव पाठवणार असून, त्याला मंजुरी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

























