२६ ऑगस्टपर्यंत पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू
marathinews24.com
पुणे – शहरातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात पुढील चार दिवस आंदोलनाला बंदी घालण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. या भागात आंदोलन, निदर्शने करणे, तसेच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन पुणे पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. राहुल गांधी यांचा ‘छात्रो की गूंज’ हा कार्यक्रम एसएसपीएमएस प्रशालेच्या मैदानावर शनिवारी पार पाडला. हा कार्यक्रम पार पडण्यापूर्वी शुक्रवारी सायंकाळी ‘सीओईपी’तील विद्यार्थ्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दबाब आणल्याचा आरोप करुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
पुण्यातील गणेशोत्सव निर्बंधमुक्त पाहिजे – सविस्तर बातमी
‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरुन काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशासनाने शनिवारी पोलिसांना पत्र दिले. पुढील चार दिवस ‘सीओईपी’च्या परिसरात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच नेत्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली. त्यानंतर या परिसरात पुढील कोणत्याही प्रकारचे आंदोलन, निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली, तसेच या भागात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
‘संबंधित आदेश २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत बाहेरील व्यक्ती, राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सीओईपीच्या आवारात प्रवेश करु नये. विद्यार्थ्यांशी संपर्क साधू नये. सभा, तसेच बैठका घेऊ नये. निदर्शने करु नयेत. जमाव गोळा करु नये. अशा प्रकारांमुळे शैक्षणिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आोत. या आदेशातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, तसेच ‘सीओईपी’तील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे’, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल’, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


























