४२ देशांतील १५० कलाकारांच्या ३०० व्यंगचित्रकारांचा सहभाग
marathinews24.com
पुणे – जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला गुरुवारी सुरुवात झाली. बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आलेल्या व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
उद्घाटन समारंभास आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, उद्योजक आकाश गायकवाड, ॲड. दिलीप जगताप, महोत्सवाचे आयोजक धनराज गरड, मुख्य समन्वयक किशोर शितोळे, कार्टुनिस्टस् कम्बाईनचे अध्यक्ष गौरव सर्जेराव, उपाध्यक्ष अमित पापळ उपस्थित होते. महोत्सव दि. ९ मेपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या सर्वांसाठी खुला आहे. महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात देश आणि परदेशातील १४२ कलारांच्या ३०० व्यंगचित्रांचा समावेश आहे. विविध सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय विषयांवर आधारित व्यंगचित्रांची अनोखी मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे, असे धनराज गरड यांनी प्रास्ताविकात सांगितले.
पुण्यात व्यंगचित्रकार भवन उभे रहावे अशी अपेक्षा व्यक्त करून गौरव सर्जेराव यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गरड यांनी तर आभार प्रदर्शन किशोर शितोळे यांनी केले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या वेळी सुषमा अंधारे आणि परशुराम वाडेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सुषमा अंधारे यांचे शाब्दीक फटकारे
व्यंगचित्र कमीतकमी शब्द आणि रेषांमध्ये मोठा आशय मांडते. बरे बोलण्यापेक्षा खरे बोलले पाहिजे ही भूमिका ठामपणे बजावत व्यंगचित्रकार त्याच्या चित्रांच्या माध्यमातून संवेदनशीलता, जाणिवा जीवंत ठेवत बोलत राहतो, चित्र काढत राहतो. कुठलीही मदत, कौतुक नसताना निष्ठा ढळू न देता शब्द-रेषांमधून व्यक्त होतो तो खरा व्यंगचित्रकार होय. विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आपल्यावरील व्यंगचित्राचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, विधान परिषदेसाठी मी इच्छुक होते यात लपविण्यासारखे काहीच नाही. पक्ष नेतृत्वाकडे मी हक्काने काही तरी मागितले. त्यावेळी सत्तेसाठी शेजारच्याला बाप म्हटले नाही, कारण मी विचारधारेवर ठाम आहे. मी प्लॅटफॉर्म बदलणारी व्यक्ती नाही. ध्येयासाठी मी कायम सोबतच असेन. व्यक्तीशी मतभेद असला तरी माझा प्रामाणिकपणा संस्थेशी टिकून असेल आणि संस्थेच्या विचारधारा बदलल्या तर मी माझ्या विचारधारेशी निष्ठा ठेवेन. यातूनच मी ठामपणे बोलत आणि मते मांडत राहीन. व्यंगचित्र बघताना खेळकरपणा आणि रसिकता असणे अवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
व्यक्त होण्यात अभाव-परशुराम वाडेकर
व्यंगचित्रकार व्यक्ती, सामाजिक परिस्थिती, ज्वलंत घटना यावर योग्य ते चपखल भाष्य करत रेषांच्या माध्यमातून प्रभावी संदेश देतात. आज-काल वृत्तपत्रांच्या माध्यमातून व्यंगचित्रकार व्यक्त होताना दिसत नाहीत. कारण वर्तमान पत्रांनी त्यांची स्वायतत्ता घालवलेली आहे. व्यंगचित्रकारामध्ये क्रांती घडविण्याची, झोपलेली मने जागविण्याची ताकद आहे. त्यामुळे ही कला जीवंत ठेवणे आवश्यक आहे.























