डीजेऐवजी पारंपरिक ढोल-ताशांना प्राधान्य देण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव हे समाजाला एकत्र आणणारे महत्त्वाचे माध्यम असून, त्यातून सामाजिक एकोपा आणि परस्परांना मदत करण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे हे उत्सव उत्साहात साजरे झाले पाहिजेत; मात्र त्याचवेळी त्यांचे पावित्र्य आणि सर्वसामान्य नागरिकांची शांतता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत लोकमान्य टिळक यांचे पणतू रोहित टिळक यांनी व्यक्त केलं.
शंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने रसिक मंत्रमुग्ध – सविस्तर बातमी
धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून माणसाला मानसिक आधार आणि एक प्रकारचे सामाजिक कवच मिळते. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली, तरी एखाद्या ‘सुपरपॉवर’समोर नतमस्तक होण्याची भावना माणसाला चांगले आचरण करण्याची प्रेरणा देते. मात्र उत्सवांचे स्वरूप मोठे होत असताना त्यामध्ये अनावश्यक भपकेबाजी, मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम, वाहतुकीसह नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या बाबी वाढता कामा नयेत. न्यायालय आणि प्रशासनाने घातलेले निर्बंध हे उत्सवांच्या विरोधात नसून, ‘उत्सवही साजरा व्हावा आणि नागरिकांनाही त्रास होऊ नये’, या संतुलनासाठी असल्याचे सांगण्यात आले.
पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीकडे डीजेला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांत ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनामध्ये शिस्त, नवीन ताल आणि कोरिओग्राफी आणली आहे. अनेक पथके नियमांचे पालन करून वादन करीत असल्याचेही नमूद टिळक यांनी नमूद केले. पुण्यात उत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा सध्या चर्चेत असून, पोलिस प्रशासनाने कर्णकर्कश डीजे, प्लाझ्मा आणि प्रेशर साउंडवर निर्बंध कायम ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ध्वनी मर्यादा आणि ढोल-ताशा वादनाबाबतही नियमांचे पालन आवश्यक असल्याचे न्यायालयीन निर्देशांमध्ये नमूद आहे. उत्सवाची परंपरा आणि श्रद्धा जपत, नागरिकांच्या आरोग्याचा व शांततेचा अधिकारही अबाधित ठेवणे हीच खरी उत्सव संस्कृती असल्याचे मत लोकमान्य टिळक यांचे पणतू रोहित टिळक व्यक्त केले.





















