सिंहगडावर राजाराम महाराज जयंतीचा जल्लोष

सिंहगडावर राजाराम महाराज जयंतीचा जल्लोष

छत्रपतींच्या जयघोषात पालखी ; अभिषेक, भजन व्याख्यानातून स्वराज्यभावनेचा जागर

marathinews24.com

खडकवासला – स्वराज्याचे तिसरे छत्रपती, छत्रपती राजाराम महाराज यांची तिथीनुसार जयंती यंदा प्रथमच सिंहगड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अभिषेक, पूजन, भजन आणि इतिहासप्रेरित व्याख्यानाच्या माध्यमातून स्वराज्यनिष्ठेचा जागर साकारला. छत्रपतींच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या नामघोषात रंगलेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला होता.

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली – सविस्तर बातमी 

छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीस्थळी ढमढेरे परिवाराच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयजयकारात पालखीत छत्रपती राजाराम महाराजांची मूर्ती विराजमान करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि नामघोषात पालखी सोहळा मार्गस्थ झाला.

प्रसाद महाराज भांडवलकर, हेमंत महाराज क्षीरसागर आणि विश्वास महाराज कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पालखी श्रीकोंढाणेश्वर मंदिर येथे पोहोचली. येथे योगेश जगदाळे, प्रसाद चावरे, राहुल चव्हाण, सिंहगडचे वनरक्षक बळीराम वायकर, सुनित लिंबोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, सुनील जागडे आणि नितीन गोळे यांच्या हस्ते श्रीकोंढाणेश्वराची विधिवत पूजा-अभिषेक आरती करण्यात आली. उपस्थित शिवभक्तांनी शंभू महादेवाच्या भजनांनी वातावरण दुमदुमून टाकले.

यानंतर नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीला अभिनेते प्रतिक मोहिते तसेच फारशी व मोडी भाषेचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक अशोक सरपाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाचा समारोप श्रीअमृतेश्वर मंदिर येथे झाला. मंदिराच्या मुख्य दरवाजात पालखीतील राजाराम महाराजांच्या मूर्तीचे औक्षण विद्या बेंद्रे, सोनाली सरपाटील, प्रियांका मोहिते, मनिषा कळमकर आणि सारिका वारूळे यांनी केले. श्रीअमृतेश्वर भैरवाची आरती अरविंद वारूळे, मनोहर टेमघरे, प्रवीण पोकळे, अश्विन पित्रोडा आणि स्वप्नील सांबरे यांच्या हस्ते संपन्न झाली.

इतिहास अभ्यासक प्रथमेश खामकर यांनी राजाराम महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राचा आढावा घेत स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा, संकटसमयी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टीचा जागर केला. सदर सोहळ्याचे आयोजन हिंदू युवा प्रबोधिनी चे अध्यक्ष राजेंद्र बेंद्रे आणि अभिषेक कोळी यांनी केले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×