यवत आणि सासवड येथे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
marathinews24.com
पुणे -जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रम स्तुत्य असून प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्याप्रकारे मिळते, अशी प्रतिक्रिया पालखीतळाच्या ठिकाणी आयोजित प्रदर्शनाला भेट देणाऱ्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमांतर्गत ३० पॅनल असलेले प्रदर्शन, एलईडी व्हॅन व त्यावर नाट्यपथक, आकर्षक चित्ररथ, पथनाट्याद्वारे राज्य शासनाच्या विभागनिहाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्डची सुविधा पशुपालकांना देणे, पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकासाला चालना, बळीराजा शेतकऱ्याच्या उन्नतीसाठीच्या योजना व घेतलेले निर्णय, नागरिकांना भेसळविरहित अन्नधान्य मिळावे यासाठी सुरक्षित अन्न तपासणीच्या सुविधा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, ‘महाविस्तार- एआय’ ॲप, सायबर सुरक्षितता, जलसिंचनासाठीचे प्रकल्प, सामाजिक न्यायासाठी मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना, आदिवासींच्या उत्थानासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत ३० लाख घरे मंजूर, पीएम- जनमन, रमाई, शबरी, अटल बांधकाम कामगार वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोदी आवास योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय पशुसंवर्धनअंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, राज्य स्तरावर कॉल सेंटरची स्थापना, पशु आरोग्य सेवांसाठी टोल फ्री क्रमांक, सहकार विभागांतर्गत आपले सहकार पोर्टलवर सहकार विभागाच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध, परिवहन विभागांतर्गत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, गोवारी बांधवांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना, दिव्यांगणसाठी स्वतंत्र विभाग, उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी आदी माहिती या प्रदर्शनात फ्लेक्स पॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
मुकुंद हावळे, अर्जूनसोंड, जि. सोलापूर- संवादवारी उपक्रमाच्या माध्यमातून शासन आणि वारकरी यांचा संवाद होत आहे. राज्य शासनाने विविध लोककल्याणकारी योजनांनी माहिती या उपक्रमाद्वारे मिळत आहे.