सिंहगड रस्ता परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – मोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खून – मोबाइल न विचारता वापरल्याने झालेल्या वादातून एकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात घडली. गु्न्हा घडल्यानंतर तीन तासात नांदेड सिटी पोलिसांनी पसार झालेल्या कंपनीतील दोन कामगारांना अटक केली. देवा उर्फ देवीदास पालते (वय २५, रा. तागयाल, ता. मुखेड, जि. नांदेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीतील कामगार गजानन हरिश्चंद्र राठोड (वय ३२, रा. आडगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ), महारुद्र शिवाजी गवते (वय २७, रा. साईधाम, त्रिनेत्र इंजिनिअरिंगजवळ, धायरी, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली.
पालते, राठोड, गवते हे कामगार आहेत. सध्या तिघे जण धायरीत राहायला आहेत. देवा याने आरोपी गजानन याचा मोबाइल न विचारात वापरल्याने त्यांच्यात वाद झाला. गजानन आणि त्याचा साथीदार महारुद्र यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील देवाला एकटे सोडून आरोपी गजानन आणि महारुद्र यांना मिळाली. या घटनेची माहिती नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शिवा क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेतील देवाला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पसार झालेले आरोपी गजानन आणि महारुद्र यांना अटक केली. चौकशीत देवा याने न विचारता मोबाइल संच वापरल्याने त्याला बेदम मारहाण करुन खून केल्याची कबुली दिली. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहीयक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, संग्राम शिनगारे, राजू वेगरे, प्रतीक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भीमराज गांगुर्डे, उत्तम शिंदे, निलेश कुलथे यांनी ही कामगिरी केली.
दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुण ठार – महापालिका भवन परिसरात अपघात
दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना महापालिका भवन परिसरात घडली. निनाद विनाेद पाचपांडे (वय ३१, रा. वाकड, पिंपरी-चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई ऋतिक वाघ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार निनाद मंगळवारी (२९ जुलै) सकाळी आठच्या सुमारास भरधाव वेगात महापालिका भवन परिरातून निघाला होता. रामसर बेकरीसमोर दुचाकीस्वार निनाद याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. दुुचाकीस्वार निनाद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, उपनिरीक्षक मोहिनी जाधव तपास करत आहेत.
ज्येष्ठ महिलेची ६ लाखांची फसवणूक
थकित पाणीपट्टी भरण्याची बतावणी करणारा संदेश ज्येष्ठ महिलेला पाठवून बँक खात्यातून सहा लाख ४४ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय महिला नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. महापालिकेची पाणीपट्टी थकित असल्याची बतावणी चोरट्यांनी संदेशात केली होती. महिलेने संबंधित संदेशात असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची माहिती चोरट्यंनी घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी महिलेचा मोबाइल संच हॅक केला. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या बँक खात्यातून चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहा लाख ४४ हजार रुपये लांबविले. खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.






















