खासदार फुटीवरून खासदार अमोल कोल्हे यांचा घणाघात
marathinews24.com
पुणे – नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी रस्ते, पूल बांधणे गरजेचे आहे. पण हे करण्यासाठी तुम्हाला फुटायचे आहे का? त्याला फुटणे नाही, तर विकणेच म्हणतात, अशा टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी (दि.२१) केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे खासदार फुटीवरून त्यांनी टीकास्त्र सोडले. पुणे पत्रकार कट्ट्याच्यावतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी संयोजक नीरज जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. योगेश बोराटे, संदीप नर्डीले उपस्थित होते.
योग मानवतेचा धागा घट्ट करणारी वैश्विक भाषा-प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया – सविस्तर बातमी
डॉ. कोल्हे म्हणाले, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व महत्वाचे आहे. मात्र, आता प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात द्विपक्षीय राजकारण लादले जात आहे. प्रदेशाच्या अस्तित्वासाठी, हित जोपासण्यासाठी प्रादेशिक पक्ष टिकवण्याची गरज आहे.’ ‘महाराष्ट्र धर्म काय आहे, हे पुढच्या पिढीला सांगायचे असेल तर, महाराष्ट्राच्या डीएनएमधील समतेचा विचार काय आहे, तो आधी सांगावा लागेल. संतांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आता ‘तथाकथित हिंदुत्व’ हे बाहेरच्या लोकांनी शिकवण्याची गरज आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘महागाईचा फटका सर्वांनाच बसत असून, व्यक्त होण्याचे धाडस जनतेत आहे का? त्यासाठी विरोधकांनी मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलने केली पाहिजेत. पण, विरोधकांच्या मोर्चाला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल, जेव्हा झळ सोसणारी सर्वसामान्य जनता त्या मोर्चांमागे उभी राहील,’ अशी खंत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. दरम्यान, ‘मी राजकारणात असल्यामुळेच सावित्रीबाई- ज्योतिराव फुले यांच्यावरील मालिका टेलिव्हीजनवरून बंद करायला सांगण्यात आली. कलेकडे एकाच चष्म्याने बघणार्यांनी कुठलीही गोष्ट राजकारणातूनच केली जाते, असे वाटणार्यांनी त्यांचा चष्मा बदलायला हवा. सावित्रीबाई- ज्योतिराव फुले ही मालिकासुद्धा स्वच्छ हेतूनेच केलेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
























