जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व समाजकार्यकर्त्यांचा गौरव
marathinews24.com
पुणे – शांतिलाल सुरतवाला हे पुण्याशी एकरूप झालेले व्यक्तिमत्त्व होते. काळाच्या पुढची दृष्टी असलेल्या या माणसाने आपल्या सामाजिक कार्यातून जनमानसावर वेगळा ठसा उमटविला, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आजच्या प्रशासनासाठी दीपस्तंभ– राहुल गिरी – सविस्तर बातमी
रक्तदान चळवळीचे प्रेरणास्थान व माजी महापौर स्व. शांतिलाल सुरतवाला यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १८) बाजीराव रोडवरील वरद श्री हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे तसेच रक्तदान चळवळीत योगदान देणाऱ्या संस्थांच्या व व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. मोरे अध्यक्षपदावरून बोलत होते. शांतिलाल सुरतवाला मित्र परिवार आणि आचार्य आनंदऋषिजी ब्लड बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उल्हास पवार, आमदार हेमंत रासने, अंकुश काकडे, डॉ. सतिश देसाई, दगडूशेठ गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्येष्ठ संपादक सुनील माळी, संयोजक प्रकाश ढमढेरे, भोला वांजळे, दत्ता सागरे मंचावर होते. गणेश चव्हाण, बाबू नवले, अशोक जाधव यांचे सहकार्य लाभले.
संत निरंकारी मंडळ पुणे, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, दक्षिण पीठ नाणीजधाम, सिद्धी फाऊंडेशनचे मनोज छाजेड, ललित जैन, तसेच बाळासाहेब कापरे, सत्यजीत देसाई (केडगाव), ससून रुग्णालयातील निवृत्त कर्मचारी मानसिद्ध बी. शेळके यांचा गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आमदार हेमंत रासने म्हणाले, शांतिलाल सुरतवाला यांनी समाजाला रक्तदानाच्या माध्यमातून देण्याची सवय लावली. त्यांच्यामुळेच रक्तदान उपक्रमाला चवळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. उल्हास पवार म्हणाले, रक्तदान चळवळीत शांतिलाल सुरतवाला यांची दूरदृष्टी दिसून येते. ही रक्तदानाची चळवळ सुरू करून अनेक वर्षे झाली तरीही समाजाला अशा उपक्रमांची आजही आवश्यकता आहे.
लोकहित जपणारे मनस्वी राजकारणी, कल्पक सामाजिक कार्यकर्ते अशा शब्दांत सुनील माळी यांनी शांतिलाल सुरतवाला यांचे पैलू उलगडून दाखविले. भविष्यात रक्तदान चळवळ सुरू ठेवूया अशा भावना अंकुश काकडे यांनी व्यक्त केल्या. महेश सूर्यवंशी म्हणाले, रक्तदानाविषयी नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज होते ते सुरतवाला यांनी दूर केल्याने रक्तदात्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
दत्ता सागरे यांनी प्रास्ताविक केले तर भोला वांजळे यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली.























