हिंगोलीतील अल्पवयीन मुलीला पालकांच्या स्वाधीन केले
marathinews24.com
पुणे – आई-बाबांवरील रागामुळे १६ वर्षीय मुलीने घर सोडून थेट पुणे शहर गाठले. घर सोडलेली अल्पवयीन मुलगी बुधवार पेठेच्या ‘रेड अलर्ट’ परिसरात एकटीच फिरताना पोलिसांच्या नजरेत आली. थाेडा जरी उशीर झाला असता, तर तिचे संपूर्ण आयुष्य अंधाराच्या दरीत लोटले असते. पण फरासखाना पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ती मुलगी सुखरूपपणे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. घरातून रागाच्या भरात बाहेर पडणार्या अनेक मुलांसाठी डोळे उघडणारा धडा ठरला आहे.
आर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस दि. ८ जुलैला पेट्रोलिंग करीत असताना बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळ एक संशयास्पद अल्पवयीन मुलगी फिरताना आढळली. पोलिस मित्रांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि अंमलदार गजानन सोनुने, रेखा राऊत, सारिका गुंजाळ, अनिता साबळे यांनी मुलीला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संबंधित मुलगी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील असल्याची माहिती मिळाली. घरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून ती पुण्यात आली होती. मात्र, हिंगोलीत तिच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. याबाबत त्वरित हिंगोली पोलिसांशी संपर्क साधून त्यांना मुलगी सुखरूप असल्याची माहिती दिली.
अल्पवयीन मुलीला हिंगोलीच्या आखाडा पोलिसांच्या समक्ष आई-वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहायक पोलिस निरीक्षक उत्तम नामवाडे यांच्या पथकाने केली.