शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालयाचा ९९ वा वर्धापनदिन उत्साहात
marathinews24.com
पुणे – औषधोपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता गरिब आणि गरजू रूग्णांना मोठ्या हॉस्पीटसमध्ये जाऊन उपचार घेणे जवळपास अशक्य झाले आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर देखील शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालय आपले सेवेचे व्रत कायम ठेवत गरिब आणि गरजू रूग्णांप्रती कटिबद्ध राहिल, असा विश्वास शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त गोपाळ राठी यांनी व्यक्त केला.
कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज मान्यवर दिले-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ – सविस्तर बातमी
शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालय, पुणेने ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त आज आयोजित वर्धापनदिन समारंभात गोपाळ राठी बोलत होते. रास्ता पेठ येथील रूग्णालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र हुपरीकर, प्रसिद्ध उद्योजक सत्यप्रकाश जोशी, अष्टेकर ज्वेलर्सचे विपूल अष्टेकर आणि रूग्णालयाचे विश्वस्त डॉ. अभय इनामदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना विश्वस्त गोपाळ राठी म्हणाले की, ‘टू सर्व्ह द कॉमन मॅन’ या उदात्त हेतूने पायाभरणी करण्यात आलेल्या या रुग्णालयाने कायमच आपले सेवेचे ध्येय ढळू दिले नाही. औषधोपचार, शल्यचिकीत्सा साधने, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगारापासून इतर खर्च या सगळ्याची जुळवाजुळव करणे अवघड होते. मात्र, समाजातील दानशूर व्यक्तींचा रूग्णालयावर असलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या जोरावर मिळणाऱ्या देणग्या तसेच राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेकडून वेळोवेळी मिळणाऱ्या मदतीच्या हातांमुळे आजवरच्या प्रवासाचा टप्पा गाठता आला आहे. रूग्णांना अल्प दरात सेवा देताना आधुनिक उपचार पद्धतीवर तडजोड न करता आज आणि भविष्यातही सेवा देत राहू. रुग्णालय व्यवस्थापन, कर्मचारी, विद्यार्थी या सगळ्यांनीच त्यांच्या कामातून नैतिक कार्यप्रणाली रूजवण्याचा कायमच प्रयत्न केला. रूग्णालयाव्दारे पैसे कमावणे हे ध्येय कधीच नव्हते आणि भविष्यातही ते नसेल.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक सत्यप्रकाश जोशी आणि अष्टेकर ज्वेलर्सचे विपूल अष्टेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शतक वर्षाच्या पदार्पणानिमित्त डॉक्टरांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. रूग्णालयात कार्यरत असलेले गुणवंत डॉक्टर, परिचारिका, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऐश्वर्या रानडे यांनी केले. डॉ. कल्याणी भट यांनी आभार मानले,

























