फसवणूकीतील पसार आरोपीला कर्जदारांनी मुंबईत पकडले, ३९ जणांना १५ लाख ७८ हजारांचा घातला होता गंडा
Marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र बेरोजगार परिषदेकडून कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने ३९ जणांना १५ लाख ७८ हजारांचा गंडा घालणाऱ्या एकाला कर्जदारांनी मुंबईतून पकडून पुण्यात आणले. दरम्यान, याप्रकरणी मुंबईतून अपहरण केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कर्ज मंजुरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.
याबाबत लविना अमोदन मरियन (वय ४७, रा. आदर्शनगर सोसायटी, कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शोधन भावे, आशा चौधरी, वैष्णवी कुलकर्णी-पाठक, अनुप सुभेदार, राजेश कानभास्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार महाराष्ट्र बेरोजगार परिषदेचे कार्यालयात नोव्हेबर
२०२४ ते १ एप्रिल २०२५ दरम्यान घडला. शोधन भावे आणि साथीदारांनी संगनमत करुन महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून कागदपत्रे घेत कर्ज मंजुरीसाठी त्यांच्याकडून शुल्क घेतले. कर्ज मंजूर न करतान ३९ जणांची १५ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलिसंनी दोन महिलांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केकाण तपास करत आहेत.
आरोपीचे अपहरण भोवले, तिघांना अटक
शोधन अनिल भावे (वय ५७, रा. करण क्लारिसा सोसायटी, वारजे) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवी पाठक (वय ३५), दिनेश येवले (वय ४०), अविनाश पाठक (वय ४०), आश्फाक कासीम आगा (वय ३५), अमोघन अॅलेक्स (वय ३६), राजेश शेषनारायण कंट्रोलु (वय४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ९ एप्रिलला ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून कर्ज मंजूर करण्याचे शुल्क म्हणून १५ लाख ७८ हजार रुपये घेतले होते. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कर्जदारांनी भावेचा शोध घेतला. तो अंधेरीतील हाॅटेल कलिंगात असल्याची माहिती कर्जदारांना मिळाली. त्यानंतर त्याला अंधेरीत कर्जदारांनी पकडून पुण्यात आणले, येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात त्याला मारहाण केली. भावेचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके तपास करत आहेत.