समस्त वडार समाजातर्फे नागरी सत्कार
marathinews24.com
पुणे – पोलिसांच्या अमानुष मारहाणीत बळी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामुळे नव्या आणि जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याची सरकारला संधी मिळाली आहे. या प्रकरणामुळे कोठडीत असताना मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे मत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. सोमनाथ यांची आई आणि कुटुंबियांनी दाखविलेल्या धैर्यामुळे यामध्ये जे पोलिस दोषी आहेत, त्यांना नक्की शिक्षा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष तपासणी मोहिम – सविस्तर बातमी
परभणीतील ठाण्यात पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या वडार समाजातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटंबियांना न्यायिक लढा देऊन न्याय मिळवून देणाऱ्या ॲड. आंबेडकर यांचा सोमवारी (दि. २५) महाराष्ट्रातील समस्त वडार समाजातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ॲड. आंबेडकर बोलत होते. यावेळी वडार समाजाचे नेते डॉ. अनिल नारायण जाधव यांनी या सत्काराचे आयोजन केले होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी, भाऊ शिवकुमार सूर्यवंशी उपस्थित होते. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध भागातून वडार समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, गेल्या वर्षाचा विचार केला तर कोठडीत अटकेत असलेल्याचा मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. याप्रकरणात केवळ तीन घटनांमध्ये दोषींना शिक्षा झाली आहे. सूर्यवंशी कुटुंबियांनी दाखविलेल्या धैर्यामुळे कायद्यातील त्रुटी दूर होण्यास मदत होणार आहे. या प्रकरणात उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात कशा पद्धतीने बाजू मांडली याविषयीही त्यांनी माहिती दिली. एसआयटी दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. एसआयटीने योग्य तऱ्हेने तपास केला नाही तर त्याविषयी तक्रार करण्याची मुभाही मिळाली आहे. समाज व्यक्त व्हायला लागला आहे. समाजातील उर्जेला वाट करून देण्यासाठी संधी मिळावी यासाठी सत्काराचा स्वीकार केल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.
धर्माचे राजकारण समाजव्यवस्थेच्या फायद्याचे असते. परंतु सध्या धर्माचे राजकारण द्वेषाचे व्हायला लागले आहे. द्वेषाच्या राजकारणात समाज म्हणून एकत्र असले पाहिजे. सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात काय भूमिका बजावली याविषयी माहिती देऊन डॉ. अनिल नारायण जाधव यांनी सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळला असल्याने ॲड. आंबेडकर यांच्या सत्काराचे आयोजन केले असल्याचे सांगितले. विजयाबाई सूर्यवंशी आणि शिवकुमार सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.






















