शिवछत्रपतींचे दुर्ग म्हणजे जिवंत शिवशाहीर- शिवव्याख्याते मोहन शेटे

यूनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा म्हणजे शिवरायांना जागतिक मुजरा – मोहन शेटे

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग आपल्या देदीप्यमान इतिहासाचे साक्षीदार आहेत. या दुर्गांना यूनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, ही आनंदाची, अभिमानाची बाब आहेच, पण त्याबरोबरीने दुर्गांचे योग्य जतन आणि संवर्धनाची जबाबदारीही आपली आहे, याचे भान ठेवून दुर्गांचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे कारण हे दुर्ग जिवंत शिवशाहीर आहेत, असे उद्गार प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि शिवव्याख्याते मोहन शेटे यांनी काढले आहेत.

नवदुर्गांच्या कर्तृत्वामुळे समाजकार्यासाठी उभारी-खासदार सुप्रिया सुळे – सविस्तर बातमी

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत, पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय आणि सृजनसभा, पुणे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते महात्मा गांधी जयंती या कालावधीदरम्यान सेवा पंधरवडा उपक्रमातील विशेष कार्यक्रम म्हणून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शिवचरित्रकार गजाननराव मेहेंदळे यांच्या स्मृतींना हे शिवव्याख्यान समर्पित करण्यात आले होते. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हे व्याख्यान झाले. ‘छत्रपती शिवरायांचे दुर्ग – जागतिक वैभव’, या विषयावर शेटे यांनी मांडणी केली. यावेळी पुरातत्त्व विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे, प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे, सृजनसभा प्रमुख संगीतकार होनराज मावळे हे उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, “शिवछत्रपतींच्या दुर्गांना यूनेस्कोने नुकताच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातील ११ दुर्ग आणि तमिळनाडू येथील जिंजीचा किल्ला, यांचा यामध्ये समावेश आहे, हा जणु शिवरायांच्या कर्तृत्वाला जगाने केलेला मानाचा मुजरा आहे. शिवरायांचे दुर्ग हे केवळ दगड, माती, तटबंदी, बुरुज, दरवाजे, महाल नव्हेत, प्रत्येक दुर्ग हा शिवकालीन त्यागाचा, बलिदानाचा, शौर्याचा, निष्ठेचा..धगधगता इतिहास आहे. प्रत्येक शिवकालीन दुर्ग प्रेरणेचा, स्फूर्तीचा स्रोत आहे. हे दुर्ग जागतिक वारसा स्थळांत समाविष्ट झाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे.

दुर्गांचे योग्य व्यवस्थापन, डागडुजी, स्वच्छता, सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. दुर्गांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास, यूनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढून घेऊ शकते, आणि तसे झाल्यास तो शिवछत्रपतींचा अपमान ठरेल. त्यामुळे शासकीय यंत्रणेसोबत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे, की दुर्ग सुरक्षित, स्वच्छ ठेवले पाहिजेत. त्यांचे पावित्र्य अबाधित राखले पाहिजे. त्यासाठी सातत्याने जाणीवजागृती करत राहिले पाहिजे. शिवनेरी, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, जलदुर्ग, जिंजी आणि दुर्गदुर्गेश्वर रायगड, अशा दुर्गांची उभारणी, सजावट, रचना, त्यामागील शिवरायांची दूरदृष्टी याविषयी शेटे यांनी माहिती सांगितली.

विलास वहाणे म्हणाले, शिवदुर्गांचे महत्त्व समजून घेणे आणि त्याविषयी जनजागृती करण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात ऐतिहासिक विषयावर सृजनसभेने कार्यक्रमाचे आयोजन केले ही गौरवाची बाब असून अशा उपक्रमांमुळे संस्थेचे भविष्य उज्ज्वल असेल, असेही शेटे म्हणाले. होनराज मावळे यांनी प्रास्ताविकात सृजनसभा संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. उमेश झिरपे यांनी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या दुर्गांच्या जतन – संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. अनुजा जोशी यांनी सृजनगान सादर केले. विलास वहाणे यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×