कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत २१ आस्थापनांतील १७३ कर्मचाऱ्यांचा गौरव
marathinews24.com
पुणे – कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयएस) अंतर्गत कार्यरत २१ आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले. सध्या सुमारे ६० लाख कामगार या योजनेत समाविष्ट असून ही संख्या दोन कोटींपर्यंत वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सोहळ्यात तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कार्यालयीन कर्मचारी, पॅरामेडिकल कर्मचारी तसेच परिचर अशा विविध घटकांमधून प्रत्येकी दोन अशा एकूण १७३ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
देशी गाईपासून शाश्वत शेतीकडे: संशोधनाची प्रभावी वाटचाल – सविस्तर बातमी
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव रवींद्रन, राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त श्री रमेश चव्हाण, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, संचालक (प्रशासन) श्री सोहम वायाळ, वैद्यकीय संचालक डॉ. अशोक थोरात, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, मोहन नगर, चिंचवड (पुणे) येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा सुपे तसेच विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, यावेळी ते म्हणाले, ईएसआयएस मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवाभावाचे कौतुक करत, आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या सोहळ्यामुळे ईएसआयएस कर्मचाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळून, भविष्यातही उत्कृष्ट सेवा देण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आबिटकर म्हणाले, राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर द्यावा.
सध्या सुमारे ६० लाख कामगार या योजनेत समाविष्ट असून ही संख्या दोन कोटींपर्यंत वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. रुग्णसंख्या वाढविण्यासोबतच शस्त्रक्रियांची संख्याही वाढविणे आवश्यक आहे. रुग्णालयांतील बेड ऑक्युपन्सी वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. राज्य कामगार विमा रुग्णालयांमध्ये मोठ्या शस्त्रक्रियांसाठी खर्चावर कोणतेही बंधन नसल्याने अधिकाधिक रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यावर भर द्यावा.
राज्य कामगार विमा रुग्णालयांचा दर्जा उंचावून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. इएसआयसी व ईएसआयएस यामधील डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.
आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची भूमिका आणि कर्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक व्हावे, यासाठी अशा सन्मान सोहळ्यांचे आयोजन महत्त्वाचे आहे.
या उपक्रमांमुळे आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक वातावरण निर्माण होऊन समाजाचा विश्वास अधिक दृढ होईल. सर्वांनी उत्कृष्ट कार्य करून अशा गौरवासाठी पात्र ठरावे, असेही आबीटकर म्हणाले.
























