१७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतरही शारीरिक-मानसिक त्रास; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – लग्नाला १७ वर्षे झाल्यानंतरही विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आर्थिक छळ सुरूच ठेवला. अखेर विवाहितेने छळाला कंटालून विश्रामबाग पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. यावरून सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय लक्ष्मण तुपे, अलका लक्ष्मण तुपे, लक्ष्मण बबन तुपे, कौस्तुभ लक्ष्मण तुपे (सर्व रा. शनिवार पेठ, पुणे) आणि सागर पांगारे अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार असल्याची माहिती विवाहितेने दिली.
पुण्यातील दबावाने झुकलेली महसूल यंत्रणा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचे २००८ मध्ये विजय तुपे याच्याशी लग्न झाले. त्यानंतरच सासरच्या मंडळींनी ‘हुंडा कमी दिली’ या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यास सुरूवात केली. विवाहितेच्या आईसमोरही तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. विवाहितेच्या वडिलांनी लग्नापूर्वी तिच्या नावावर घेतलेला हडपसर येथील फ्लॅट जबरदस्तीने विकण्यास भाग पाडून त्या फ्लॅटमधून आलेले ७ लाख ६७ हजार ८८३ रुपये पती व सासू यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास तिला जबरदस्ती केल्याचा आरोपही विवाहितेने फिर्यादीत केला आहे.
मुलांसमोर अश्लील बोलणे, तसेच दारूच्या नशेत बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध, त्याला नकार दिल्यास मारहाण आणि धमक्या, असे प्रकार वारंवार होत होते. त्यानंतर २०१६ मध्ये पडद्याच्या पाईपने मारहाण आणि दीर कौस्तुभ तुपे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यानच्या काळात नवऱ्याने अनेकदा आर्थिक अडचणी सांगून विवाहितेच्या आईकडून आलेले पैसे तसेच कर्ज काढून पैसे देण्यास भाग पाडल्याचे देखील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलिसांकडून सुरू असून आरोपींच्या शोध घेतला जात आहे.






















