ओैंधमधील ब्रेमेन चौकातील घटना
marathinews24.com
पुणे – पुण्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू -विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१३) मध्यरात्री औंधमधील ब्रेमेन चौकात घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तरुण ब्रेमेन चौकातील एका पडीक जागेत दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी जवळच्या असलेल्या एका विद्युत रोहित्राला त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. विनोद चिंतामण क्षीरसागर (वय २९, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निकाळजे (वय २७, रा. पौड रस्ता, कोथरूड) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
शुद्ध सोन्याच्या नावाखाली पुणे, पिंपरीतील सराफांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि सौरभ हे मित्र आहेत. ओैंधमधील ब्रेमेन चौकात महावितरणाचा रोहित्र आहे. रोहित्राजवळ पडीक जागा आहे. या जागेचा वापर कोणी करत नाहीत. रविवारी रात्री दोघे जण विद्युत रोहित्राजवळील पडीक जागेत मद्यपान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रोहित्रातून उतरलेल्या विद्युत प्रवाहाला त्यांचा स्पर्श झाला. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी दोन तरुण रोहित्राजवळ असलेल्या पडीक जागेत मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.
ब्रेमेन चौकातील तिसरी घटना
ब्रेमेन चौकात दोन वर्षांपूर्वी साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच भागात चार वर्षांपूर्वी एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री ब्रेमेन चौकातील रोहित्राजवळ असलेल्या पडीक जागेत मद्यपान करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. रोहित्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेत स्थानिक तरुण नेहमी मद्यपान करण्यासाठी जातात. तेथे काटेरी कुंपण घालणे गरजेचे आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
घटनेची महावितरणकडून चौकशी
दुर्घटनेची महावितरण आणि पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली. महावितरणच्या तंत्रज्ञांनी दिेलेल्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. पावसाळ्यात विद्युत प्रवाह पाण्यात उतरून दुर्घटना घडतात. दोन वर्षंपूर्वी हडपसर भागात साचलेल्या पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता.