एकात्मता भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू

एकात्मता भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे प्रतिपादन

marathinews24.com

पुणे – ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार असल्याने भारतीय संस्कृती निरंतर आहे. याचा अर्थ भौतिकता, विज्ञानाकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही. एकात्मता भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू आहे. विविधतेचा सन्मान करून स्वीकारणे महत्त्वाचे आहे. ज्ञान दृष्टी प्राप्त करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले.

विकसित भारतासाठी तंत्रज्ञान व बांधकाम क्षेत्राचे मोलाचे योगदान – सविस्तर बातमी 

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत आयोजित पुणे लिट फेस्टचे उद्घाटन खान यांच्या हस्ते
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये झाले. त्यावेळी ते बोलते होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर या वेळी उपस्थित होते.

अनेक संस्कृत श्लोक उद्धृत करत खान यांनी साहित्य, वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. खान म्हणाले, साहित्याचा आस्वाद, सज्जनांचे सान्निध्य हा अमृतानुभव असतो हे आपल्या परंपरेत मानले जाते. ब्रह्मज्ञानाच्या जवळ नेते ती कला, साहित्य असते. लहानपणापासूनच पुस्तकांची आवड होती. पुस्तक वाचनामुळे आजीचा ओरडा, फटका खावा लागायचा. पुस्तकाने ज्ञान संपादन सुलभ केले. एकेकाळी लेखनाला जगात विरोध झाला होता. ज्ञानाची संस्कृती भारतात होती. संगणकासारख्या तंत्रज्ञानाला घाबरण्याचे कारण नाही, उलट त्याने ज्ञानाचा प्रसार होण्यास मदत होते. जितका ज्ञानाचा प्रसार होईल, तितका देश प्रगती करतो. ऋग्वेदाला युनेस्कोने सर्वांत प्राचीन मानले आहे, यापेक्षा भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अन्य पुराव्याची गरज नाही. अरबांनी भारतीय साहित्याचा पहिल्यांदा अनुवाद केला. युरोपच्या अवकाश अभ्यासाचा आधार सूर्य सिद्धांत हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अरबीतून युरोपात गेला. आपले ज्ञान आपल्या ज्ञानाचा आधार ठरत नाही ही चिंतेची बाब आहे. भारतीय संस्कृती ज्ञान आणि प्रज्ञेच्या संवर्धनाची संस्कृती आहे. अरबीमध्ये हिंद या शब्दाचा अर्थ सुंदर असा होतो. ही सुंदरता ज्ञानाची आहे.

पुणे हे सांस्कृतिक, साहित्यिक चेतनेचे महत्त्वाचे केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, त्यांचा गीतारहस्य ग्रंथ, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा फुले यांची आठवण या शहरामुळे आहे, असेही खान यांनी नमूद केले.

मराठे म्हणाले, पुन्हा पुन्हा वाचले जाते ते अभिजात साहित्य असते. ज्ञान, मनोरंजन आणि समाजाला दिशा देण्याची ताकद साहित्यामध्ये असते. पुणे लिट फेस्टमध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग आहे. वाचा, ऐका आणि भारत समजून घ्या ही या महोत्सवाची संकल्पना आहे.

आरिफ मोहम्मद खान यांच्यासारखे विद्वान लिट फेस्टच्या उद्घाटनाला येणे ही भाग्याची गोष्ट आहे. गेल्या वर्षी पुस्तकांच्या २५ लाख प्रती विकल्या गेल्या. तरुण वाचतात हे या महोत्सवाने सिद्ध केले. महोत्सवात लहान मुलांसह प्रत्येकासाठी काहीतरी आहे. पुणे लिस्ट फेस्टही सर्वांत मोठा महोत्सव होईल, असे राजेश पांडे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×