भारती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास होणार मदत
marathinews24.com
पुणे – शहरात पोलीस भरती प्रक्रियेत पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. लेखी, मैदानी चाचणी स्पर्धेत तोतया उमेदवार सहभागी होत असल्याने ‘फेस रेकग्नेशन’ कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे.
पुणे पोलीस दलातील १ हजार ८३३ पोलीस शिपाई पदाच्या जागांसाठी आतापर्यंत ८६ हजार २४० अर्ज दाखल झाले आहेत. कारागृह विभागातील शिपाई पदाच्या १३० जागांसाठी ९० हजार ७९१ अर्ज दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बऱ्याचदा भरतीप्रक्रियेत गोंधळ उडतो; तसेच मैदानी चाचणी स्पर्धेत काही उमेदवार गैरप्रकार करतात. मूळ उमेदवाराऐवजी दुसरे उमेदवार मैदानी स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे यंदा भरतीप्रक्रियेत ‘फेस रेकग्नेशन’ कॅमेऱ्यांचा वापर करण्यत येणार आहे.
उमेदवारांची छायाचित्रे, त्यांची माहिती या कॅमेऱ्यांकडे असणार आहे. मूळ उमेदवाराऐवजी दुसरी व्यक्ती सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्वरित सूचना दिली जाणार आहे. शारीरिक मोजमाप, स्वच्छतागृहातून बाहेर पडणारे उमेदवारांचे चेहरे हे कॅमेरे टिपतील. जेणेकरून मैदानी स्पर्धेत गैरप्रकार होणार नाहीत. मैदानी चाचणीत धावणाऱ्या उमेदवारांनी किती वेळेत अंतर पूर्ण केले, याबाबतची माहिती देण्यासाठी मैदानावर सेन्सर बसविण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
























