विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर विविध तर्क वितर्क सुरू असतानाच खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणात गंभीर शंका उपस्थित केली आहे. विमानात बॉम्ब होता का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक – सविस्तर बातमी
खासदार सोनवणे म्हणाले, अपघातावेळी विमानात ६ जण होते, मात्र घटनास्थळी पाच मृतदेहच सापडले. हा प्रकार संशयास्पद असून संपूर्ण घटनेचा तपास सार्वजनिक झाला पाहिजे. अजित पवार घरातून निघतानाचे तसेच विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आणावे, अशी मागणीही त्यांनी केली. पायलट कोण होता, विमान हवेत असतानाच ब्लास्ट कसा झाला, याची देखील चौकशी झाली पाहिजे. अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही चौकशी व्हावी. अपघाताच्या दिवशी सकाळपासूनचे सर्व फुटेज जाहीर करण्यात यावे, असे सोनवणेंनी स्पष्ट मत व्यक्त केले.
भावूक होत सोनवणे म्हणाले, माझ्या राजकीय जडणघडणीत अजितदादा पवार यांचा मोठा वाटा होता. १९९९ पासून आमचा संबंध होता. अजितदादा माझे राजकीय वडील होते. आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश दुःखात आहे. ज्याच्यावर आम्ही परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम केलं, तो वाघ आज आपल्यातून निघून गेला. येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून एका वर्षात स्मारक पूर्ण करून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले, हे आमचं दुर्दैव आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
























