पुणे कौटुंबिक न्यायालयाचा निकाल
marathinews24.com
पुणे – संसारातील विसंवादामुळे गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या राहणार्या दाम्पत्याला पुणे कौटुंबिक न्यायालयाने दिलासा दिला आहे. सामंजस्याने घेतलेल्या निर्णयाची दखल घेत, न्यायालयाने अवघ्या १८ दिवसांत जोडप्याचा परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला आहे. याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
पुण्यात बसमध्ये महिलांचे दागिने चोरणारे सराईत अटकेत – सविस्तर बातमी
राहुल आणि नेहा (नावे बदललेली आहेत) यांचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले. स्वभावातील तफावत आणि पटत नसल्यामुळे हे जोडपे २०२१ पासून एकमेकांपासून विभक्त राहत होते. भविष्याचा विचार करून, अखेर या दोघांनीही कटुता न ठेवता कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दावा दाखल केल्यापासून १८ दिवसांत आणि पहिल्या सुनावणीपासून केवळ ९ दिवसांत हा निकाल देण्यात आला.
न्यायालयाने नमूद केले की, जेव्हा पती-पत्नी दीर्घकाळापासून वेगळे राहत असतात, तेव्हा त्यांच्यातील मने दुरावलेली असतात. पुन्हा ते एकत्र येण्याची शयता कमी असते. अशा परिस्थितीत, भविष्याचा विचार करून सामंजस्याने घेतलेला निर्णय दोघांच्याही हिताचा असतो. या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने अॅड. प्रियंका अघोर-कुलकर्णी (धाराशिव)यांनी काम पाहिले. त्यांनी प्रभावीपणे मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांमुळे आणि जोडप्याच्या संमतीमुळे न्यायालयाने जलद निकाल दिला आहे. निर्णयामुळे ‘वेटिंग पिरियड’च्या तांत्रिकतेत न अडकता जोडप्याला पुढील प्रवास सुरू करण्याची संधी मिळाली आहे.






















