अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी दिले जाते कर्ज
marathinews24.com
पुणे – अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत २०१८-२५ या कालावधीत पुणे जिल्ह्यात ९ हजार ६२३ अर्जदारांना बँकांनी कर्जवाटप केले आहे. मंजूर कर्जाचे नियमित हप्ते भरून परतफेड करणाऱ्या कर्जदार लाभार्थ्यांना ५९ कोटी ८८ लाख रुपये परतावा दिल्याची माहिती महामंडळाचे विभागीय समन्वयक संकेत लोहार यांनी दिली आहे.
मराठा समाजातील बेरोजगार तरुण, तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय करावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने बिनव्याजी कर्ज देण्यात येते. महामंडळाच्या या योजनेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १ लाख ४० हजारावर तरुण तरुणींनी १३ हजार २८६ कोटी रुपये कर्ज घेऊन स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करीत आदर्श निर्माण केला आहे.
महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेसाठी अर्जदार पात्र असल्याचे पत्र देण्यात येते. या पत्रासह अर्जदाराने बँकेकडे कर्ज प्रस्ताव करावा लागतो. अर्जदाराने बँकेच्या कर्जाचा हप्ता अदा केल्यानंतर त्याच्या खात्यात व्याजाची रक्कम महामंडळाकडून जमा करण्यात येते.
महामंडळाच्या या वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत ११ हजार ८५० अर्जदार पात्र ठरले आहेत. यापैकी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी ९ हजार ६२३ जणांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करीत त्यांच्या प्रकल्पासाठी ९०८ कोटी ६९ लाख रुपये कर्जवाटप केले.
महामंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात फक्त एकच जिल्हा कार्यालय आहे. महामंडळाच्या नावाखाली कोणी त्रयस्त व्यक्ती पैसे घेत असेल, स्वतःला महामंडळाचा कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून संबोधित असेल तर त्यांच्यावर महामंडळाच्या आदेशानुसार गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात यावा. मराठा समाजातील बांधवांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन लांबोटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.