‘छत्रपती महाराणी ताराराणी’ पुस्तकाचे प्रकाशन
marathinews24.com
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, या भावनेतून, त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून छत्रपती महाराणी ताराराणी यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्य टिकविण्याचे कार्य केले. त्यांच्याकडे उत्तम युद्ध व प्रशासकीय कौशल्य होते. या कौशल्याच्या जोरावर त्यांनी औरंगजेबाशी सात वर्षे लढा देऊन त्याला जेरीस आणले. त्यांचे हे कार्यकर्तृत्व समाजापर्यंत पोहोचू शकले नाही. ‘छत्रपती महाराणी ताराराणी’ या पुस्तकाच्या माध्यमातून ताराराणींचे महात्म्य, स्वराज्य टिकविण्यासाठी केलेला संघर्ष समाजपर्यंत पोहोचेल, असा विश्वास युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.
सरहद पुणे, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली आणि मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे महाराणी ताराराणी यांच्या ३५१व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाच्या निमित्ताने ‘छत्रपती महाराणी ताराराणी’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि महाराणी ताराराणी सन्मान सोहळा गुरुवारी (दि. २) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी युवराज संभाजीराजे छत्रपती बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर मंजुषा नागपुरे, सरहदचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, पुस्तकाचे लेखक मयूर मसूरकर, गोपाळ कांबळे मंचावर होते. पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याने दिल्ली येथे आयोजित संमेलनाच्या कार्याचा शुभारंभ झाला.
छत्रपती महाराणी ताराराणी सन्मानाने अबोली राऊत, डॉ. लीना बोकील, ममता सपकाळ, मेजर डॉ. मोनिका बारणे, अंजू माने, साधना चव्हाण, सुवर्णा गोखले, आशा खेडकर, अलका गुनजाळ, स्वाती डिंबळे यांना गौरविण्यात आले. सन्मानार्थींच्या वतीने मेजर मोनिका बारणे, अलका गुनजाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
छत्रपती महाराणी ताराराणी यांचे कार्य प्रेरणादायक असून त्यांचे युद्ध व प्रशासकीय कौशल्य युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे सांगून युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या नावाने सन्मानित करण्यात आलेल्या महिलांचे कार्य अभिनंदनीय असून समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्या कार्यरत आहेत. विघातक समाजासाठी विधायक कार्य होणे आवश्यक आहे. सन्मानार्थी महिला या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांच्या वारसदार आहेत.
तैलचित्रासाठी मुख्यमंत्र्यांना फोन करतो
छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तैलचित्र मुंबईतील मंत्रालयात आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनात नसल्याचे संजय नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले. हा धागा पकडून युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मंत्रालयात आणि महाराष्ट्र सदनात छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तैलचित्र लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फोन करतो. तैलचित्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच वेळप्रसंगी त्यांच्यावर दबाव टाकण्याची भूमिकाही घेतो, असे त्यांनी जाहीर केले.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, मराठा साम्राज्य टिकविण्यासाठी केलेले छत्रपती महाराणी ताराराणी यांचे कार्यकर्तृत्व महनीय असून त्यांच्या ३५१व्या जयंती वर्षात हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे. त्या शौर्य, धैर्य असणाऱ्या रणरागिणी होत्या. प्रशासकीय कार्यात महिला अधिकारी अनेक महत्वाच्या भूमिका बजावीत आहेत. हे कार्य करत असताना त्यांचा साहित्य क्षेत्रातील वावर कौतुकास्पद आहे. नागरीक आणि सरकारमधील दुवा असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नागरिक आणि राजकारण्यांमुळे भरड होते, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महिला शासकीय अधिकाऱ्यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही अभिनंदनीय घटना असून महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात संजय नहार यांनी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत असलेल्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावियषी अवगत केले. लेखनाविषयी मयूर मसूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सातपुते आणि गोपाळ कांबळे यांनी केले तर आभार डॉ. संगीता शिंदे यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, मनिषा वाडेकर, सुजाता गोळे, कविता वानखेडे, डॉ. संगीता शिंदे यांनी केले.























