हिंदू साम्राज्य दिन उत्सवात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे प्रतिपादन
marathinews24.com
पुणे – हजार वर्षांच्या गुलामगिराच्या बेड्या तोडून हिंदवी स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने युगपुरुष होते असे उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी गुरुवारी काढले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार नगर येथील अरण्येश्वर प्रभात शाखेच्या ‘हिंदु साम्राज्य दिन’ उत्सवात ते बोलत होते. संघचालक अविनाश धोमकर व ज्येष्ठ पत्रकार, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक सुनील माळी उपस्थित होते.
पुण्यात फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची मर्जी – सविस्तर बातमी
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा संघातर्फे हिंदु साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.या उत्सवात बोलतांना श्री बलकवडे यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रातील घटनांचा उल्लेख करत त्यामागील सूत्र सांगितले. परदेशातील लोक संस्कृती विसरले,म्हणून त्या संस्कृती नष्ट झाल्या.पण भारतात राज्यकर्त्यांनी, धर्मरक्षकांनी आपल्या प्राचीन संस्कृतीची नाळ सोडली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात प्रभु रामचंद्रांचे चारीत्र्य आणि भगवान श्रीकृष्णाची राजनीती होती. त्यामुळे ते यशस्वी झाले. महाराजांचा स्वराज्याइतकाच सुराज्यावरही भर होता. त्यामुळे इथला शेतकरी कसा सुखी होईल याची चिंता त्यांनी केली. शेतकरी सुखी व संपन्न झाल्यामुळे बारा बलुतेदारांचे उत्पन्न वाढले, रोजगार निर्माण झाला आणि राज्याचे उत्पन्नही वाढले. रयतेवरचे कर कमी करुनही राज्याचं उत्पन्न वाढविणारा एकमेव राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करावा लागेल असे ते म्हणाले.
महाराजांनी सांस्कृतिक क्रांती बरोबरच धर्म, कृषी,अर्थ ,संरक्षण आणि राजव्यवहार या वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेतले.त्यामुळेच त्यांच्या राज्याला रामराज्य म्हटले जाऊ लागले असे सांगून ते म्हणाले की सामान्य माणसातून महाराजांनी असामान्य माणसं घडवली. सर्वस्व राष्ट्रार्पण ही भावना त्यांच्यात बिंबवल्यामुळे या सहका-यांनी अशक्यप्राय वाटणारी कामगिरी सहजपणे पार पाडली असेही श्री बलकवडे म्हणाले. प्रारंभी सुनील माळी यांनी बलकवडे यांचा परिचय करुन दिला. बलकवडे यांनी केलेला अभ्यास म्हणजे एक प्रकारचं तप आहे. या साधनेमुळेच त्यांच्या लिखाणाला एक प्रकारचे वजन प्राप्त झाले आहे. सुहास काणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भूषण करमरकर यांनी सांघिक गीत सांगितले. जे.डी. कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्य म्हटले. शिरीष वनारसे यांनी अमृतवचनाचे व संजीव खळदकर यांनी बोधवाक्याचे वाचन केले.




















