डॉ. श्रीपाल सबनीस सन्मान व्याख्यानमालेचा शुभारंभ
marathinews24.com
पुणे – वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी आहे तर सनातनी संप्रदायाचा मूळ आधार वेद आहे. हे दोन्ही संप्रदाय मानवी जीवनाला प्रेमाची दिशा देण्याचे कार्य करतात. सनातन धर्म हा केवळ एक सिद्धांत असून त्या धर्माचे प्रत्यक्ष आचरण करणे म्हणजे वारकरी संप्रदाय होय. तर वारकरी संप्रदाय म्हणजे सुलभ आणि सर्वसमावेशकतेने बनवलेला सनातन धर्म होय, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांनी केले.
स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा – सविस्तर बातमी
मनोहारी मैत्र संघ, पुणेतर्फे डॉ. श्रीपाल सबनीस सन्मान व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बुधवारी (दि. १) डॉ. अभय टिळक आणि संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे यांनी गुंफले. व्याख्यानमालेचा विषय ‘वारकरी संप्रदाय व सनातन धर्म’ असा होता. त्या वेळी डॉ. टिळक बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाल सबनीस होते. महावितरणचे संचालक राजेंद्र पवार, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, संयोजक मनोहर कोलते मंचावर होते. कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्काराने ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांचा गौरव करण्यात आला. सरहद संस्थेचे संघटक लेशपाल जवळगे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. अभय टिळक म्हणाले, वारकरी आणि सनातनी संप्रदाय एकरूप नसले तरी भिन्नही दिसत नाहीत. त्यामुळे यांचे नाते पाहणाऱ्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. दोन्ही विचारांचा मूळ भागा एकच असला तरी वारकरी संप्रदायाचा उदय जुन्या सनातनी वैदिक चौकटीच्या मर्यादा आणि कुंपणे तोडून झाला आहे. वारकरी संप्रदायाने वेदांचे महात्म्य मान्य केले असले तरी सामाजिक विषमता नाकारली आहे. तर ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे म्हणाले, सनातन धर्म हा शाश्वत असून त्याला आदि-अंत नाही. तो अनंत आहे. या धर्माला कुणी एक विशिष्ट संस्थापक नाही. वारकरी संप्रदाय देखील सनातन धर्माप्रमाणेच वेदप्रणित उपासना मार्ग किंवा भागवत धर्म आहे. दोन्ही विचारधारांमधील मूलतत्त्वे सारखीच आहेत. ज्यात सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती, परोपकार, विश्र्वबंधुत्व दर्शविले आहे. वारकरी संप्रदायाचा मुख्य पाया अद्वैत वेदांतावर रचलेला आहे. अद्वैत ज्ञान म्हणजे भेद नष्ट होणे असून विज्ञान म्हणजे भेद स्पष्ट होणे होय. अंत:करणात परोपकार, अहिंसा आणि सत्य ठेवून मार्गक्रमण करणे म्हणजेच सनातनी आणि वारकरी धर्माची वाटचाल करणे होय आणि ही वाटचाल केल्यास समाजाची प्रगती शक्य आहे.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, सनातन धर्म हा केवळ एका संप्रदायापुरता मर्यादित नसून तो मानवी मूल्यात्मकता आणि वैश्र्विक सत्यावर आधारलेला आहे. तो खऱ्या अर्थाने मानव धर्म असून त्याला कोणत्याही देशाच्या सीमा रोखू शकत नाही. सनातन धर्माची मूल्ये कोणा एका धर्माची बांधिल नसून जगातील अनेक धर्मांमध्ये ती प्रकर्षाने आढळतात. दुसऱ्याला मदत करणे किंवा परोपकार करणे म्हणजे पुण्य असून दुसऱ्याला दु:ख-परपिडा देणे म्हणजे पाप होय. सत्य हाच खरा धर्म आहे. आजच्या लोकशाहीत मतभेदांचा आणि विचारांचा आदर राखला जाणे आवश्यक असून विरोधी मत मांडणाऱ्यांचा गळा दाबून दहशत निर्माण करणे हे सांस्कृतिक लोकशाही नाही. तसेच सुधीर गाडगीळ म्हणाले, बोलणे आणि बोलके करणे हा माझ्या जीवनातील आवडता भाग असल्यामुळे विविध व्यक्तींना भेटत गेलो. कुतुहलापोटी त्यांच्याशी संवाद साधत गेलो आणि ४५ वर्षात चार हजार सातशे व्यक्तींना बोलते करू शकलो. यातून असामान्य कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजासमोर आणता आले याचा आनंद आहे.
राजेंद्र पवार, ॲड. प्रमोद आडकर, लेशपाल जवळगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात मनोहर कोलते यांनी व्याख्यानमालेविषयी माहिती दिली. चारुशीला बेलसरे यांनी ‘कानडाऊ विठ्ठलू’ हा अभंग सादर केला. सूत्रसंचालन भगवान थेटे यांनी केले तर आभार पराग शिळिमकर यांनी मानले.






















