बारामती तालुक्याच्या कृषी क्षेत्राला राज्यस्तरीय मान्यता; तीन शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचे कृषी पुरस्कार
marathinews24.com
बारामती – कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ १ जुलै रोजी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी (मुंबई) येथे आयोजित करण्यात आला; यामध्ये तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
केंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने काटेवाडीचे यतीन घुले सन्मानित
यामध्ये ऊस व केळी पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच शास्त्रीय पीक व्यवस्थापनाचा अवलंब करून उत्पादनात सातत्याने वाढ साधणारे आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे काटेवाडी येथील यतीन बापुराव घुले यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने तांदुळवाडीचे योगेश नालंदे सन्मानित
कृषीविषयक योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीविषयक माहितीचा प्रसार करणाऱ्या ‘शेतकरी योद्धा’ वृत्तपत्राचे संस्थापक तांदुळवाडी येथील योगेश नामदेव नालंदे यांना ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने कुरणेवाडीच्या छाया पवार सन्मानित
महिला शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा ‘जिजामाता कृषीभूषण पुरस्कार’ कुरणेवाडी येथील छाया तानाजी पवार यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी सोयाबीन, हरभरा, ऊस आदी पिकांचे सुधारित वाण, स्वतःच्या शेतात बीजोत्पादन, तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद, शेंगदाणे व कडधान्य पिकांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धनाच्या व्यवसायातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
या पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांच्या सन्मानामुळे तालुक्याच्या कृषी क्षेत्राच्या कार्याला राज्यस्तरावर दखल घेतली आहे, या यशस्वी शेतकऱ्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली आहे.




















